पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महावितरणतर्फे जिल्ह्यातील सर्व विभागीय कार्यालयांमध्ये दि.२० फेब्रुवारी रोजी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले असल्याची माहिती अ. भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
वीज ग्राहकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी निवारण्यासाठी महावितरणतर्फे दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी आयोजन होते. तथापि त्या दिवशी सुट्टी आल्याने गुरुवारी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे फेब्रुवारी मधील ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन दि.२० फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी,अकलूज, सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण अशा सर्व विभागीय कार्यालयांमध्ये सकाळी १० ते दुपारी १ वा.पर्यंत करण्यात आले आहे. तरी वरीलप्रमाणे कार्यकारी अभियंता, महावितरण यांचे कार्यालयात उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडून, त्यांची सोडवणूक करून घ्यावी. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता,उप कार्यकारी अभियंता, सहा.अभियंता हे अधिकारी समक्ष उपस्थित राहून तक्रारी,अडचणी,सोडविणार आहेत.
तरी पंढरपूर, बार्शी,अकलूज,सोलापूर ग्रामीण,सोलापूर शहर या ठिकाणी सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांनी आपल्या अवाजवी बील,सरासरी बील आकारणी, वीज बिल वेळेत न मिळणे,मीटर रीडिंग वेळेत न घेणे,कनेक्शन वेळेत न मिळणे, योग्य दाबाने वीजपुरवठा न होणे,वारंवार वीजपुरवठा खंडित होणे,नविन मीटर वेळेत न मिळाल्यामुळे ग्राहकांना स्वखर्चाने आणलेल्या मीटरची संपूर्ण रक्कम न मिळणे, शेतकरी ग्राहकांना वेळेत डी.पी.बदलून न मिळणे अशा कोणत्याही स्वरुपातील लिखित तक्रार अर्जासह उपस्थित राहावे असे आवाहन अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दीपक इरकल,प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते,सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा महिला प्रमुख सौ.माधुरी परदेशी पंढरपूर तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये,सदस्य अण्णा ऐतवाडकर,पांडुरंग अल्लापूरकर यांनी केले आहे.