आपल्या मनातील राजे अंगीकारले हवेत !
छत्रपती शिवाजी महाराज आठवले की आपला उर भरून येतो, नसा नसा प्रफुल्लित होतात आणि आपण स्वतःला एका वेगळ्या स्वरूपात पाहू लागतो. शेकडो वर्षा नंतरही रयतेच्या हृदयाशी आजपर्यंत असणारे हे एकमेव राजे! प्रत्येकाच्या जीवाशी छत्रपती शिवराय आहेत. राजांचा फक्त जय जयकार न करता, राजांच्या गुणांचा, आचरणांचा किंचित जरी आपण अवलंब केला तरी आपण आपले आयुष्य परिपूर्ण बनवू शकतो.म्हणूनच प्रत्येकाच्या मनामध्ये दैवत्व म्हणून वसलेले, जगातील एकमेव सर्वगुणसंपन्न व ऊर्जेचा अखंड स्त्रोत असणारे हे राजे आता आपण मनातून बाहेर काढून प्रत्यक्षात स्वतः अंगीकारले हवेत.
राजांच्या अंगी असणारे शौर्य, धैर्य, पराक्रम, नेतृत्व आणि दृष्टी या गुणांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात सदैव अंगीकार करायला हवा. सदैव भविष्याची दृष्टी बाळगतच आपण आपले जीवन समृद्ध करायला हवे. आपल्याकडे भविष्यकालीन नियोजन परिपूर्ण असायला हवे. छत्रपती शिवरायांचे राज्य हे अठरापगड जातीच्या लोकांचे राज्य होते.लोकांशी माझे काही देणे घेणे नाही, मी स्वतःपुरताच ही वृत्ती बाजूला ठेवून सामाजिक नेतृत्वामध्ये आपला सहभाग दाखवत समान न्याय, समता बाळगत आपण वावरायला हवे.
छत्रपती शिवरायांचे धोरणात्मक विचार आपण अवलंबायला हवेत. आपले आयुष्य जगत असताना छत्रपतींच्या उत्तम रणनीतीचा अभ्यास आपणास नक्कीच उपयोगी पडतो. प्रागतिक धोरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा अनिवार्य झालेला आहे. त्याचबरोबर आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अनेक संकटावर मात करत; अनेक डावपेच आखत; गनिमीकाव्याचाही आपण वापर केलाच पाहिजे.
नीतीमत्तेशी बांधीलकी असल्यानेच छत्रपती शिवराय आज जगामध्ये आदरणीय आहेत. प्रत्येक विचारांचा आदर बाळगत आपण लोकांशी प्रामाणिकच असले पाहिजे. नि:पक्षपातीपणे प्रत्येकाचे धार्मिक स्वातंत्र्य कसे आबाधीत राहील याचा आपण सदैव विचार करायला हवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जाती धर्मावरून भेदभाव करायला नको.
उच्च स्थानी असूनही तितकेच नम्र असणारे आपले हे राजे, आपणास पराकोटीची संवेदनशीलता शिकवितात.प्रत्येकाबद्दल असणारे प्रेम आणि आदर सदैव कायम ठेवायला हवा .त्याचबरोबर प्रत्येकाने कुशलता प्राप्त करत, विवेकीपणाने आपले आयुष्य जगलेच पाहिजे. प्रत्येकाच्या निर्णय क्षमतेस कल्पकतेची जोड दिल्यास, व्यवहारिक चातुर्य आपण प्राप्त करू शकतो हेच आपण राजांच्या जीवनातून शिकत आहोत. राजांच्या अंगी असणारा गुणग्राहकता हा गुण तर आपण सदैव बाळगायला हवा.
कोणतीही प्रतिकूल परिस्थिती इतकी सामर्थ्यशाली असू शकत नाही की, ती निश्चित ध्येय असणाऱ्या माणसाला जास्त काळ अडकून ठेवू शकेल. हेच छत्रपतींच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात आपणाला दिसून येते. राजांनी आयुष्यभर अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जुळवून घेत लवचिकता दाखवली. प्रसंगी अनेक तह केले, किल्ले गमावले. सामर्थ्यातून ते जिंकलेही. स्वतःची रणनीती साकारत सदैव जनतेला सुखी केले.
आपल्या या राज्यांच्या गुणांचा किंचित जरी आपण अवलंब केला तर खरेच आपण आपली जीवन नक्कीच सुखी, संपन्न करू शकतो म्हणूनच आपण आपल्या मनातील राजे बाहेर बाहेर काढून आपण स्वतः ते अंगीकारले हवेत!
प्रशांत वाघमारे पंढरपूर 986078635
सर्वांना पुढे पाठवा व प्रतिक्रिया कळवा.
छत्रपती शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना अंत:करण पूर्वक शुभेच्छा