तानाजी कांबळे, राज्याध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना यांची शासन दरबारी मागणी
मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज गणेश हिरवे
विद्यार्थी संख्येअभावी जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळांतून अतिरिक्त झाले आहेत, त्यांना प्रचलित नियमानुसार इतर शाळांत समायोजित करण्यात येते. संचमान्यतेच्या जाचक अटींमुळे दरवर्षी अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरत आहेत. अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत चालल्याची माहिती संघटनेचे सचिव श्री संजय केवटे यांनी यावेळी दिली.
वेळेत समायोजन न झाल्यामुळे अनेक अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे निवडणूक कार्यालय, शिक्षण विभाग कार्यालय किंवा आपल्या मूळ शाळेत कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आता निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. अतिरिक्त जरी असले तरी त्यांचे वेतन आणि इतर सर्व प्रक्रिया मूळ शाळेतूनच पूर्ण केली जाते. सेवानिवृत्तीपूर्वी 6 महिने आधीच या अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे पेंशन पी एफ प्रस्ताव, सेवा उपदान, भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडे पाठविले जातात. जेणेकरून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन निवृत्त झाल्यानंतर लगेच सेवानिवृत्तीनंतरचे लाभ, पेंशन मिळावी.
सेवानिवृत्तीस 6 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधी असलेल्या अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन इतर शाळांत केल्यास सेवानिवृत्ती नंतरचे लाभ, पेंशन मिळण्याच्या प्रक्रियेत क्लिष्टता येते. किंबहुना शाळा, संस्था आणि शिक्षण विभाग यात गुंतागुंत वाढत जाते. वेळेचाही अपव्यय होतोच. शिवाय उतारवयात निवृत्तीच्या वेळेस शारीरिक, मानसिक त्रासाला आमच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना सामोरे जावे लागत असल्याने निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
6 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समायोजन प्रक्रियेतून वगळण्यात यावे. ते ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्याच ठिकाणी त्यांना कार्यरत ठेवावे आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री तानाजी कांबळे यांनी शासनास केली आहे. यासाठी मा शिक्षण आयुक्त,
मा शिक्षण संचालक, प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग, मा शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मा शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई उत्तर दक्षिण आणि पश्चिम विभाग यांना संघटनेने मागणी निवेदन पाठविले आहे.