पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने पुन्हा एकदा संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात यशाची नवी उदाहरणे सादर केली आहेत. विद्यापीठस्तरीय स्पर्धेत स्वेरीच्या दोन प्रकल्पांची निवड राज्यस्तरीय ‘अविष्कार २०२४' साठी झाली आहे. या यशाबद्दल स्वेरीतील संशोधकांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
‘स्वेरी’ हे संशोधन आणि नवोपक्रमशील संस्कृतीचे प्रतीक आहे हे आता सर्वश्रुत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत विद्यापीठस्तरीय ‘अविष्कार २०२४’ ही संशोधन स्पर्धा सोलापूर मधील वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित केली होती. या स्पर्धेत पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ३० हून अधिक महाविद्यालयांतील ४१४ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे संयोजन डॉ. रश्मी दीक्षित आणि डॉ. सतीश काशीद यांनी केले. ही स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करणारी ठरली. यामध्ये स्वेरीच्या दोन प्रकल्पांनी उल्लेखनीय कामगिरी केली. स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात पीएच.डी. अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले प्रा.अमितकुमार रामचंद्र शेलार यांनी प्युअर सायन्सेस (पीपीजी) गटात पहिला क्रमांक मिळवला. त्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे रोहित शंकर पवार यांना कृषी (युजी) गटात दुसरा क्रमांक मिळाला. त्यांना संशोधन अधिष्ठाता डॉ. ए. पी. केने यांचे मार्गदर्शन लाभले. ‘अविष्कार २०२४’ स्पर्धेकरिता समन्वयक म्हणून प्रा. दिग्विजय रोंगे यांनी काम पाहिले. यशस्वी संशोधक विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, विश्वस्त व पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे आणि उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी विजेत्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले व त्यांचे कष्ट आणि नाविन्यपूर्ण विचारांची प्रशंसा केली. विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
यावेळी प्र. कुलगुरू डॉ. दामा म्हणाले की, ‘अविष्कार मध्ये विजेतेपद मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तयारी करावी. आणि त्यात देखील यश खेचून आणावे.’ असे सांगून उपयुक्त मार्गदर्शन केले. सन २००६ साली महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एस.एम. कृष्णा यांच्या पुढाकाराने विद्यापीठस्तरीय ‘अविष्कार’ ही संशोधनात्मक स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात येते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणांना चालना देणे, त्यांच्यामधील संशोधनवृत्ती जोपासणे, नाविन्यपूर्ण विचारांसाठी प्रोत्साहित करणे आणि संशोधनाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवणे यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरली आहे. युनिव्हर्सिटी स्तरावरील या स्पर्धेत प्युअर सायन्सेस, कृषी, ह्युमॅनिटीज, इंजिनिअरिंग अशा विविध श्रेणींमध्ये युजी, पीजी आणि पीपीजी स्तरावरील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी निवडलेले प्रकल्प आता राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करतील. स्वेरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनाचा गौरव सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मिळविलेले यश महाविद्यालयातील संशोधन आणि नवकल्पना वाढवण्याच्या कटिबद्धतेचे परिमाण आहे, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलतेचा आणि ज्ञानाचा शोध घेण्यासाठी प्रेरणा देणारे आहे, हे मात्र निश्चित!