२३ डिसेंबर पासून सुरु होणारी सोलापूरची विमानसेवा ठरली अफवा - फ्लाय ९१ कंपनी बॅकफूटवर
निवडणुकीसाठी राज्यकर्त्यांनी तमाम सोलापूरकरांची केली फसवणूक.
२३ डिसेंबर निषेध नोंदवा - सोलापूर विचार मंच.
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सप्टेंबर महिन्यात गडबडीत सोलापूर विमानतळाचे ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात गोवा येथील फ्लाय ९१ या विमान कंपनीने आपण २३ डिसेंबर पासून सोलापूर ते गोवा व मुंबई अशी विमानसेवा देणार असल्याचे घोषित केले. त्याला प्रतिसाद देण्यासाठी सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके यांनी सोलापूर - गोवा पहिल्याच विमानाचे संपूर्ण बुकिंग कंपनीला दिले परंतु कंपनीने त्यांना हे बुकिंग करण्याची असमर्थता दर्शवली आहे. वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांमधून या कंपनीने सोलापूर मध्ये धुके व इंधनाच्या बाबी समोर करून पळ काढला आहे. विशेष म्हणजे आपल्या वेबसाईटवरून सोलापूर साठी जाहीर केलेले दरपत्रक सुद्धा गायब केले आहे.
याच विमान कंपनीची पुणे, जळगाव अगाती अशा इतर ठिकाणी विमानसेवा सुरू आहे मग त्या ठिकाणी धुके व इंधनाची समस्या नाहीत का? नागरी उद्ययन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा निवडणुकीदरम्यान सोलापुरात प्रचारासाठी आले असताना आपल्या पत्रकार परिषदेमध्ये २३ डिसेंबर पासून विमानसेवा सुरू होणार हे ठासून सांगितले होते.
गेले वर्षभर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सातत्याने लवकरच विमानसेवा सुरू होईल अशी वारंवार आश्वासने देत आहेत.
आज सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके यांनी ई-मेल लिहून प्रधानमंत्री कार्यालय, नागरी उद्ययन मंत्रालय ,एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, डीजीसीए, मुख्यमंत्री, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी सोलापूर, विमानतळ प्रमुख सोलापूर इत्यादींना आपण २३ डिसेंबर २०२४ पासून सोलापुरात विमानसेवा सुरू करू शकला नाहीत व अशी अफवा पसरून सर्व सोलापूरकरांची फसवणूक केलेली आहे याचा जाहीर निषेध नोंदवलेला आहे. याची जबाबदारी घेऊन केंद्रीय नागरी उद्ययन मंत्री किनीजारापू राममोहन नायडू व राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चेअरमन एअरपोर्ट ऑफ इंडिया व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी राजीनामे दयावेत अशी मागणी केलेली आहे.
२३ डिसेंबर विमान सेवा निषेध दिन-
या गोष्टीचा निषेध म्हणून सर्व सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी कागदाची अथवा प्रतीकात्मक विमाने उडवून त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करावेत असे आवाहन सोलापूर विचार मंच तर्फे करण्यात आलेले आहे.
फ्लाय ९१ कंपनीला पुढे करून येथील राज्यकर्त्यांनी सोलापूरकरांची चक्क फसवणूक केलेली आहे व निवडणुकीच्या आधी खोटी अफवा पसरवून मते मिळवण्याचा लाजिरवाणा प्रयत्न केलेला आहे. सोलापूर शेजारीच कलबुर्गी ,कोल्हापूर, जळगाव ,सिंधुदुर्ग ,शिर्डी येथे आज अनेक वर्षे विमान सेवा व्यवस्थित सुरू असून तेथून अनेक नवीन ठिकाणी विमानसेवा सुरू झालेल्या आहेत. ५० च्या दशकात सोलापूर पेक्षाही छोटे असलेल्या शेजारील पुण्यामध्ये हवाई दलाची २.५ किलोमीटरची धावपट्टी असून तेथून आज जवळपास दररोज १०० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होते व ३८ ठिकाणी विमाने जातात परंतु १९४८ सालापासून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे स्वतःच्या मालकीचे व शहरा नजीकचे होटगी रोड विमानतळ असून त्याची २.१ किलोमीटरची धावपट्टी आजही रिकामी पडलेली आहे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.
*सोलापूरची विमानसेवा सुरू न होण्याची कारणे-*
होटगी रोड विमानतळातील प्रमुख अडथळा असलेली सिद्धेश्वर कारखान्याचे अनधिकृत को- जनरेशन चिमणी सोलापूर विचार मंचच्या साडेचार वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर १५ जून २०२३ रोजी पाडून आज दीड वर्ष लोटली परंतु येथील निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी विमानतळ सुरू होण्यापेक्षा येथून विमान कसे उडते अशा धमक्या दिल्या.
सोलापूर विचार मंचाने चिमणी हटवण्याचे काम करून दिल्यानंतर येथील सोलापूर विमानतळ सल्लागार मंडळ,शासन व प्रशासनाने तात्काळ येथील विमानतळ कसे कार्यान्वित होईल व विमानसेवा कशी सुरू होईल याबाबतीत कोणतेही ठोस पावले उचलली नाहीत व नियोजन केलेले नाही. पहिले टेंडर चिमणी पडल्यानंतर चार महिन्यानंतर काढले व अजून सुद्धा 'उडान' योजनेअंतर्गत एकही टेंडर काढलेले नाही.आग लागल्यानंतर विहीर खणने महागात पडले.
स्वतःला उद्योजक ,व्यावसायिक व उच्चशिक्षित म्हणवणाऱ्या सोलापुरातील अनेक लोकांनी सोलापूर विचार मंचच्या कार्यामध्ये पाठिंबा न देता अप्रत्यक्षपणे अडथळे आणले.
बोरामणी विमानतळाचे गाजर दाखवून वायफळ चर्चा अजून सुद्धा चालूच आहे, जे विमानतळ आयुष्यात कदापिही होणे शक्य नाही.
सोलापुरातील सर्वच "विकास" घडवणाऱ्या काही अति उत्साही लोकांनी कोणत्येही ठोस काम न करता खोटी प्रसिद्धी लाटणे ,अफवा पसरवणे , आर्थिक तडजोडी करणे,निष्क्रिय लोकांचे सत्कार करणे यात धन्यता मानली व अशा लोकांच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करण्यामागे सोलापुरातील काही वार्ताहर व मीडिया या सर्वच गोष्टी कारणीभूत आहे.
फ्लाय ९१ कंपनीने आपण विमानसेवा सुरू करू असे लेखी आश्वासन दिल्यामुळे सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी डॉ .संदीप आडके व प्रशासनाच्या संपर्कात अनेक विमान कंपन्या होत्या त्या कंपन्या आपोआपच मागे सरकल्या.अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधींना निवडून देऊन त्यांनी सोलापूरकरांना विमानसेवेचे गाजर दाखवून नवीन वर्षाची पारंपारिक भेट दिलेली आहे असेच आता म्हणावे लागेल.
डॉ.संदीप आडके.
सोलापूर विचार मंच, सोलापूर.