कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मतदारांमध्ये ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानुसार लोकांनाच हा निकाल मान्य नाही,’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. दरम्यान, आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या वतीने एकत्रितच लढवल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
खासगी कामानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘विधानसभा निकालानंतर राज्यभर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘ईव्हीएम’बाबत माझ्याकडे आकडेवारी नाही. त्यामुळे मी फारसे बोलणार नाही; पण लोकांना हा निकालच मान्य नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. मारकडवाडी येथे मी जाणार आहे. नेमके लोकांना काय म्हणायचे आहे हे जाणून घेणार आहे. राज्यात मतांची आकडेवारी आश्चर्यकारक आहे. चार राज्यांत निवडणुका झाल्या. हरियाणामध्ये भाजपची अवस्था अतिशय वाईट होती; पण भाजपने आघाडी घेतली. जिथे छोटी राज्य आहेत तिथे वेगळे चित्र आहे. छोट्या राज्यांतील विरोधक आणि मोठ्या राज्यात सत्ताधारी असाच निकाल लागत आहे,’ असे पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला ७२ लाख मते मिळाली आहेत. मात्र, आमचे १० उमेदवार निवडून आले आहेत. अजित पवारांची ५८ लाख मते आहेत, मात्र त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले आहेत. ८० लाख मते मिळालेल्या पक्षाचे १५, तर ७९ लाख मते मिळालेल्या पक्षाचे ५७ आमदार निवडून येतात. अशी सर्व आकडेवारी आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र, मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत,’ असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचेही पवार यांनी सांगितले.