सर्वसामान्य माणसांना विज्ञानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी ‘विज्ञान भारती’ची निर्मिती - शास्त्रज्ञ डॉ.काशिनाथ देवधर
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘विज्ञानामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला फायदा व्हावा यासाठी माझे अविरत कार्य सुरू आहे. विज्ञानाच्या माध्यमातून समाजातील प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल जनजागृतीचे कार्य हाती घेतले आहे. विज्ञान भारतीची निर्मिती सर्वसामान्य माणसांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित भारतासाठी योगदान देण्यासाठी झाली आहे. हे कार्य अखंड सुरु राहील.’ असे प्रतिपादन शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना (ए.आर.डी.इ.-
अरमामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टयाब्लिशमेंट) चे सेवानिवृत्त समूह संचालक शास्त्रज्ञ डॉ.काशिनाथ देवधर यांनी केले.
अंतराळातील महत्वाची माहिती देण्यासाठी भारतीय अंतराळ संस्थेने (इस्त्रो) मोहीम हाती घेतली असून केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या इस्त्रोने अंतराळाच्या ज्ञानाचा सर्वांना लाभ घेता यावा यासाठी एक विशेष बस तयार केली असून या बसच्या माध्यमातून चंद्र, सूर्य, ग्रह, तारे जवळून पाहण्याची अनुभूती घेत अंतराळाची वैज्ञानिक माहिती घेता येणार आहे. ‘विज्ञान भारती’ आणि ‘इस्त्रो' यांच्या संयुक्त विद्यमाने या अंतरीक्ष महायात्रेचे उदघाटन ए.आर.डी.इ.चे सेवानिवृत्त समूह संचालक शास्त्रज्ञ डॉ.काशिनाथ देवधर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते विज्ञान आणि सीमेवरील अवघड कार्य यावर सविस्तर माहिती देत होते. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर पदवी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष विभागाचे प्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी शास्त्रज्ञ डॉ.काशिनाथ देवधर यांनी देशासाठी केलेल्या कार्याची व दिलेल्या योगदानाची सविस्तर व थक्क करणारी माहिती दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे प्रास्ताविकात म्हणाले की, ‘माणसाने सर्वप्रथम आपल्या देशावर, राज्यावर, जिल्ह्यावर, तालुक्यावर, आपल्या परिसरावर व आपल्या माणसांवर प्रेम करावे. हे करत असताना आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही मानसिकता देखील बाळगली पाहिजे. ‘उच्च शिक्षण’ किती घेतले? यापेक्षा त्याच्यावर ‘संस्कार’ किती आहे ? याला आज प्राधान्य दिले जाते. यासाठी विद्यार्थ्यांनी ‘लर्निंग थ्रू एक्सपोजर’ साठी तयार रहावे.’ असे आवाहन देखील त्यांनी केले. पुढे बोलताना प्रमुख पाहुणे शास्त्रज्ञ डॉ. देवधर म्हणाले की, ‘माझी भेट शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्याशी झाली तेंव्हा ते म्हणाले, 'विज्ञानाविषयी जनजागृती करणार असाल तर पंढरपूरजवळ गोपाळपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला एकदा भेट द्या' असे सांगितल्याने मी स्वेरीत आलो. पुढे ते म्हणाले ‘रणगाड्याची अचूकता वेगवेगळ्या माध्यमातून पाहिली जाते. रणगाड्याची अचूकता वाढविण्याचे कार्य देवधरांकडे होते. या कार्यातून मला सर्वप्रथम प्रेरणा मिळाली. देशासाठी जवान अहोरात्र कार्य करतात कारण शत्रू अचानकपणे हल्ला करतो. यासाठी वेळेकडे न पाहता रात्रंदिवस कामात कसे राहायचे व देशासाठी आपला वेळ कसा द्यायचा हे त्यातून शिकता आले.’ असे सांगून त्यांनी शास्त्रज्ञ प्रा.सतीश धवन, विक्रम साराभाई, न्यूटनचे नियम, डीआरडीओ संस्था, चांद्रयान, मंगळयान यासाठी इस्त्रो तील कार्य, विविध प्रयोग या प्रमुख बाबींवर लक्ष वेधून त्याबाबत सविस्तर माहिती दिली. उदघाटनाच्या अर्थात पहिल्या दिवशी अनेक शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांनी भेटी दिल्या. आता दुसरा दिवस बुधवार (दि.२५ डिसेंबर) ही प्रदर्शनाची शेवटची संधी असून आणखी शाळा स्वेरीकडे येत आहेत. यावेळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) चे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, संशोधन अधिष्ठाता डॉ.ए.पी.केणे, प्रशासन अधिष्ठाता डॉ.आर.आर.गिड्डे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.एम.पी.ठाकरे, इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ.डी. ए. तंबोळी, एम.बी. ए.चे विभागप्रमुख डॉ.के.पी. गलानी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.एस.बी.भोसले यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. ‘हर काम देश के नाम’ या विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशानुसार डॉ. देवधरांचे कार्य अक्षरशः डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे, हे मात्र नक्की.
जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.कलामांनी थोपटली शास्त्रज्ञ डॉ. देवधरांची पाठ-
देशासाठी आपले जीवन व्यतीत करणारे डॉ.देवधर म्हणाले की, ‘माझ्या एका प्रकल्पासाठी थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलामांनी ४० मिनिटांचा वेळ दिला आणि प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेतला. आणखी साधनांची आवश्यकता आहे. असे सूचित केल्यावर त्यांनी प्रकल्प पाहून ‘वेलडन’ म्हणत माझी पाठ थोपटली. डॉ. कलाम सरांनी केलेला गौरव हाच खरा माझ्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार आहे.