सामाजिक भान जागृत असणारे विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांचे कर्तव्य
-शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘आपले विद्यार्थी स्वावलंबी बनण्यासाठी साने गुरुजींनी आपले आयुष्य समर्पित केले. १८९९ ते १९५० या त्यांच्या ५१ वर्षाच्या आयुष्यामध्ये साने गुरुजींनी विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी, त्यांना आकार देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले. साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करताना त्यांच्यातील विविध पैलू समोर येतात. साने गुरुजी हे संवेदनशील होते त्यामुळे त्यांचे विद्यार्थी हे शिकून मोठे व्हावेत असे त्यांना सतत वाटायचे. त्यांनी सेवेचे, समाजाचे मूल्ये जपली. गुरुजींनी गरिबी जवळून अनुभवली होती. गुरुजी स्वतः शाळेत लावण्याची भित्तिपत्रके तयार करायचे आणि नित्य नियमाने ते शाळेत लावायचे. शिक्षणाबरोबरच संस्कार देणे व सामाजिक भान जागृत असणारे विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे.’ असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा), कॉलेज ऑफ फार्मसी( डिग्री), कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा), तसेच कासेगाव (ता पंढरपूर) मधील श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल व इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज् (आयसीएमएस) मधील शिक्षकांसाठी स्वेरीच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये खास शिक्षकांसाठी ‘साने गुरुजी आणि शिक्षक’ या विषयावर आयोजिलेल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये अकोले (जि.अहमदनगर) मधील शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी हे मार्गदर्शन करत होते. पुढील महिन्यात (दि.२४ डिसेंबर २०२४) साने गुरुजींची १२५ वी जयंती आहे त्या निमित्त हेरंब कुलकर्णी हे पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींच्या जीवनावर राज्यभर व्याख्यान देत असून साने गुरुजींच्या जीवनाचे व कार्याचे महत्व सांगत आहेत. स्वेरीमध्ये २५ वे पुष्प गुंफत असताना सानेगुरुजींच्या विविध पैलूंवर ते प्रकाश टाकत होते. स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पुढे बोलताना हेरंब कुलकर्णी म्हणाले की, ‘साने गुरुजी हे आपल्या पगारातून विद्यार्थ्यांची फी भरायचे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आपण किती समर्पण करू शकतो? हे साने गुरुजींच्या कृतीतून समजते तसेच गुरुजी प्रेमळ व आक्रमक देखील होते. विद्यार्थी का शिकले नाहीत यासाठी शिक्षकांना जबाबदार ठरवणाऱ्या पालकांना साने गुरुजी वेळप्रसंगी ठणकावून जाब विचारायचे. आजचा जमाना हा करिअर घडविण्याचा असताना साने गुरुजींचे विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य अधिक महत्त्वाचे वाटते.’ असे सांगून साने गुरुजींच्या अनेक कवितांवर प्रकाश टाकून त्यांचे अर्थ स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणातून स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘अवघड कार्य करताना सामाजिकतेचे भान जपले पाहिजे. विद्यार्थ्यांचे करीअर घडवणाऱ्या शिक्षकांचे कार्य तर सर्वोतम तर आहेच परंतु पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या उज्वल करिअरसाठी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.’ असे सांगून ‘साने गुरुजी आणि पंढरपूर’ यांचे नाते सांगून साने गुरुजींच्या जीवनातील विविध घटनांवर लक्ष केंद्रित केले. शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी आपल्या दोन तासाच्या मार्गदर्शनामध्ये साने गुरुजींच्या शिक्षण पद्धतीतील महत्त्वाचे टप्पे सांगितले.
यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी.मनियार, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा) चे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस. व्ही. मांडवे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, प्रा. शेळके, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस.मठपती, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख डॉ.आर. एन. हरीदास, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य डॉ.जयश्री चव्हाण यांनी आभार मानले.
‘आपण घरी आल्यानंतर पूर्णपणे आपला पूर्ण वेळ मोबाईल मध्ये न घालवता परिवार, मित्रपरिवार आणि पुस्तके यामध्ये घालवावा कारण आता अलीकडच्या सोशल मीडियाच्या युगात वाचन संस्कृती बंद होण्याच्या मार्गावर आहे. ‘वाचनाने आयुष्याला दिशा मिळते’ यासाठी वाचन संस्कृती जपणे आवश्यक आहे.’ असे आवाहन हेरंब कुलकर्णी यांनी केले.