पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शेती करीत असताना शेतकऱ्यांना तांत्रिक व भौतिक बाबींचा आधार व्हावा या हेतून शासनाकडून देण्यात येत असलेल्या योजना शेतकऱ्यांना वेळेत प्रमाणशीर पद्धतीने देण्यास प्रशासनाकडून चालढकल होत आहे. त्यामुळे शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहे. याची गंभीर पूर्वक दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवरून जलद आणि सुयोग्य कार्यवाही करण्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष मोहन जमदाडे यांनी केली आहे.
शासनाच्या योजनेचा लाभ होऊन शेतीच्या सुधारणेसाठी शेतकरी धडपडत असून त्यासाठी त्याला सरकारी कार्यालयांमध्ये अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत. या दप्तर दिरंगाईमुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा वाया जात असून त्याला योजनेचा लाभही मिळत नाही. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे.
अनेक कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी अनेक शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवल्यानंतरही शेतकरी वर्गास योजनांचा लाभ मिळणे मुश्किल झाले आहे. यासाठी त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव, अधिकाऱ्यांकडून होणारी दिरंगाई, ऑनलाइन सर्वर डाऊनमुळे कामामध्ये येणारा विस्कळीतपणा अशी अनेक कारणे असून प्रशासनाने गंभीर पूर्वक विचार करून ही कारणे कशाप्रकारे दूर करता येतील याची ठोस अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या अशा अनेक समस्यांबाबत जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने वेळोवेळी आंदोलने व पाठपुरावा केला असून शेतकऱ्यांना होणारा हा दप्तर दिरंगाईचा त्रास कमी न झाल्यास संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवण्यात येणार असल्याचा इशाराही जमदाडे यांनी दिला आहे.