सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरील सर्व कामे पूर्ण होऊन येथील विमान सेवा फक्त डीजीसीए यांच्या लायसन्सच्या प्रतीक्षेत आहे. उर्वरित अंतिम कामे पूर्ण करून लवकरात लवकर हे लायसन्स मिळण्याबाबत सोलापूर विचार मंचच्या डॉ. संदीप आडके यांनी नागरी उदयन मंत्रालयाचे मंत्री किनीजारापू नायडू व मुरलीधर मोहोळ, चेअरमन एअरपोर्ट ऑफ इंडिया, डायरेक्ट जनरल डीजीसीए, जनरल मॅनेजर उडान व सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाठपुरावा केलेला होता. डॉ.आडके यांना जानेवारी महिन्यातच प्रधानमंत्री कार्यालयाकडून ही तारीख कळवण्यात आलेली होती. परंतु येथील प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे सोलापूरच्या विमानसेवेच्या नुसत्या वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जायच्या. सप्टेंबर पर्यंत जर ही विमान सेवा सुरू झाली नाही तर त्याचा आगामी निवडणुकांवर नक्कीच गंभीर परिणाम होईल याबाबत वरील सर्वांना पुन्हा एकदा कळवण्यात आलेले होते त्या अनुषंगाने विमानसेवेबाबतची दिल्लीमध्ये नुकतीच बैठक होऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विमानतळाच्या देखरेखीसाठी पोलीस अथवा सीआयएसएफ यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली होती त्यानुसार पोलिसांच्या एका तुकडीचा बंदोबस्त करण्यात आल्याचे विश्वसनीय रित्या कळाले आहे.
अतिशय अत्याधुनिक अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थेसाठीची यंत्रणा विमानतळावर सज्ज झाली आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच सोलापूर विचार मंच तर्फे ११ विमान कंपन्यांना विमान सेवा देण्याबाबत सोलापूरचे पॉझिटिव ब्रॅण्डिंग करून आग्रहाचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता. त्यापैकी सात विमान कंपन्या येथे विमान सेवा देण्यासाठी उत्सुक असल्याबाबत सातत्याने आपल्या संपर्कात असल्याचे डॉ. संदीप आडके यांनी सांगितले आहे. सुरुवातीला सोलापुरातून मुंबई ,नवी दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, गोवा व तिरुपती या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्ताव देण्यात आलेले आहेत.
येथे नाईट लँडिंग फॅसिलिटी सुद्धा सुरू करावी जेणेकरून येथील विमानांना रात्री उशिरा येता येईल व सकाळी लवकर निघता येईल अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून विमान सेवा सुरू होण्यासाठी सोलापूर विचार मंच तर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात आलेले होते व त्यास आता यश आलेले दिसत आहे.