मलेशियातही आता 'राम कृष्ण हरी'चा गजर
संत नामदेव महाराज समाधी सोहळ्याचे आयोजन : नरसी नामदेवमधून दिंडीचे आज प्रस्थान
आळंदी प्रतिनिधी
बाराव्या शतकात भागवत धर्माची पताका थेट पंजाबपर्यंत पोहोचविणाऱ्या संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा आता थेट मलेशियातील क्वालालंपूर येथे होणार आहे. संत नामदेव महाराज दिंडीचे रविवारी (ता. २८) मुंबई मार्गे विमानाने मलेशियाला प्रस्थान होणार असून, तेथे 3 दिवस 'राम कृष्ण हरी' चा गजर केला जाणार आहे.यावेळी हिंगोलीमधील नरसी नामदेव येथून रविवारी संत नामदेव महाराज यांच्या पादुकांचे पुजन शिंपी समाजाचे सीओ ऑर्गेनाइजेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव मांढरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष मंगेश मांढरे उपस्थित होते.
सोमवारी (ता. २९) आळंदीत संत ज्ञानेश्वर विश्वभ्रमण दिंडीच्या माध्यमातून ५१ देशांमध्ये थोर संतांचे विचार 66 पोहोचविण्याचा संकल्प कण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील मराठवाडा, हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे, नाशिक, बारामती, जळगाव, धुळे व मध्यप्रदेश येथील साठ भाविक तसेच मलेशियातील स्थानिक मराठी भाविकही दिंडीत सहभागी होणार आहेत.- स्वामी भारतानंद सरस्वती, आळंदी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन व नगरप्रदक्षिणा करून ही दिंडी मुंबई विमानतळावरून मलेशियाची राजधानी क्वालालंपूरकडे निघणार आहे.
क्वालालंपूर येथे दिंडी मंगळवारी (ता. ३०) पोहोचणार आहे. तेथे कार्तिक स्वामी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर एक व दोन ऑगस्टला संत नामदेव महाराज यांच्या चरण पादुकांचे पूजन, अभिषेक सोहळा होईल.
आळंदीतील स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांचे कीर्तन होणार आहे. सोबत जगदीश चव्हाण, रामेश्वर डांगे, गायत्री गायकवाड यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. पंचवीसपेक्षा अधिक भाविकांना संत नामदेव गाथा ग्रंथाचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती भक्तिपथ सेवा फाउंडेशन आळंदीचे उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेषजी महाराज यांच्यासह उपाध्यक्ष दीपक चव्हाण, सचिव हनुमान घोंगडे, सल्लागार अॅड. नीलेश आंधळे यांनी केले आहे.