पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी वारीच्या निमित्तानं, श्रीपांडुरंगाच्या भेटीसाठी, लाखो वारकरी, श्रीक्षेत्र पंढरपुरकडे चालले आहेत. आषाढीवारीला गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा आहे. सर्वांना एकता-समता-बंधुतेची शिकवण देणारी आषाढीवारी हे आपले वैभव आहे. या आषाढीवारीत आता शासनदेखील सहभागी होवून लोकांना योजनाची माहिती देत आहे.
यंदा वारीत राज्यशासनाच्या दोन चित्र रथांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. "वारी पंढरीची.. दिंडी अपत्ती व्यवस्थापनाची" नावाचा चित्ररथ आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या मार्फत वारीत राज्यशासन कडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची जनजागृती करीत आहे. या चित्ररथाच्या माध्यमांतून कोणत्याही संकटकाळात राज्य शासन प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी सदैव मदतीसाठी उभे असते. नैसर्गिक आपत्ती असो अथवा मानवनिर्मित आपत्ती असो याचा मुकाबला करण्यासाठी आपत्तीपूर्व माहिती असेल तर प्रत्येक जण आपत्तीला खंबीरपणे तोंड देवू शकतो. याचीच माहिती सर्वांना होण्यासाठी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागा मार्फत आपत्ती विषयक माहिती देणारा जनजागृतीपर चित्ररथ हा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे ते पंढरपूर असा सहभागी झाला आहे.
या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागातील योजनांची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला काना-कोपऱ्यात पोहोचावी अशी माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.
या चित्ररथाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभाग यांचे कलापथक जनजागृतीचे काम करत आहे.