साहेब रागवतील, हार, फेठे नको कामाची यादी द्या
लोकसभा निवडणूका संपल्या.. कोणी विजयी झाले कोणी पराजय झाले.आता अनेक ठिकाणी पार्ट्याची तयारी केली जाईल.विजयी उमेदवारांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांच्या रांगा लागतील.काही कार्यकर्ते आपल्या आवडत्या नेत्याला भेटवस्तू देऊन खूष करण्याचा प्रयत्न करतील.हार तुरे देतील.सामान्य कार्यकर्ते नेत्याला भेटू पण शकणार नाहीत.साहेबांची परवानगी घ्यावी लागेल.किंवा साहेब घरात असूनही दौऱ्यात आहेत असे ऐकायला मिळेल.
निवडणूकीच्या काळात काळजात घुसलेले नेते...आता हळूहळू काळीजच खाऊ लागतील.त्यामुळे कार्यकर्त्यांनो आपल्या नेत्यांना भेटायला जात असाल तर कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू घेऊन जाऊ नका.तुमच्या भेटवस्तू घेतल्या जातील परंतु त्या कुठेतरी फेकून दिल्या जातील.
हाच एक आठवडा असू शकेल... साहेबांना तुम्हाला भेटायला वेळ असेल... नंतर साहेब तुमच्यासाठी कायमस्वरूपी गायबच होतील.आता मतदार संघातील सर्व लोकांनी याच आठवड्यात साहेबांना भेटायला जावा...भले साहेबांना आपण मतदान दिले नसेल तरी सुद्धा... अभिनंदन करायला काय हरकत आहे.पण आपण आपला स्वार्थ घेऊनच भेटायला जायचे...
*विकसित भारतासाठी नवीन प्लॅन....* आपल्या क्षेत्रातील ज्या ज्या काय समस्या असतील त्या एका कागदावर लिहून घ्यायच्या...त्यांची एक झेरॉक्स काढायची ...व साहेबांना सांगायचे हे आमचे काम आहे..तो एक कागद तुम्ही द्या..एकाची पोहच घ्या... पुन्हा त्या कामाचा आढावा आपणाला घेता येईल...पण साहेब रागावतील...( आरक्षण कधी मिळेल... शिक्षण व आरोग्य मोफत कधी होईल नसेल तर तुमच्या दवाखाना किंवा काॅलेज पासून सुरुवात कराल.. गरिबी केव्हा संपवणार, शेतकरी आत्महत्या कशी थांबवार , महागाई कमी करण्यात आपली भूमिका, महिला सुरक्षा धोरणात आपली भूमिका, शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यात आपली भूमिका, पेट्रोल डिझेल व गॅसचे भाव कमी व्हावेत यात आपली भूमिका, क्रीडा धोरणात आपली भूमिका,विज पाणी यात आपली भूमिका अश्या प्रकारच्या कामाची यादी द्या....कारण साहेबांना कामाचा छंद आहे...करू द्या अभ्यास .. अभ्यास करून आपले काम पाच वर्षांत पुर्ण झाले तर 2029 पर्यंत भारत जगातील नंबर एकचा विकसित देश नक्कीच होईल.... नाही विकसित झाला तर मी लेखक म्हणून आपण जी शिक्षा द्याल ती घ्यायला तयारच आहे.)
साहेब रागावले तरी चालतील.....पण मतदार संघातील सर्वांनीच असे केले तर साहेब किती कामाचा आहे...हे पुढच्या निवडणुकी पर्यंत कळेल नाही तर... साहेब पुढची निवडणूक लढण्यासाठी जात , धर्म पंथ असेल भावनिक मुद्दे घेऊन.तुमची ठासून...... नक्कीच परत भिक मागायला येतील.
साहेब रागावतील.. आपला गडी रागावेल .......पण जालीम उपाय एकच...हार गुच्छ व भेटवस्तू न देता आता आपल्या क्षेत्रातील कामाची यादी साहेबांना भेट द्या..... नवीन भारताच्या विकासाचे... नवीन प्लॅन मतदार म्हणून आपणच करूया..... नाही तर....गार झालेल्या कडीला... पुन्हा गरम करून... नवीन कडी आहे...म्हणण्याचे धंदे बंद होतील.नवीन भारत.. विकसित भारत यात आपली भूमिका महत्त्वाची ठरेल.
प्रा.आनंदा आलदर