वटसावित्री पूजन -- एक चिंतन
ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमेला सावित्रीव्रत येते स्कंद पुराणातील सावित्री-सत्यवान कथा सर्वांना ऐकून माहित आहे. सावित्रीला पती अल्पायुषी आहे हे माहीत असून सुद्धा त्यासाठी कठोर व्रत तपस्या करून आपल्या पतीचे प्राण तिने यमाकडून परत मिळविले. सावित्रीने सासरचे गेलेले वैभव परत मिळावे व समृध्दी आणि पुत्रप्राप्ती व्हावी असे तिने वरदान मिळवले. वटवृक्षाखाली सत्यवानाला जीवदान मिळाले म्हणून वटसावित्री पौर्णिमा आज सर्वत्र आपल्या पतीच्या दीर्घायुषी व सात जन्माच्या सोबतीसाठी स्त्रिया मोठ्या उत्साहाने करतात.
पुराणात स्त्रीत्वाच्या शक्तीला ओळखून कथारुप वर्णन केलेले आहे, म्हणून सावित्री सत्यवानाचे जीवन मृत्यू भारतीय नारींना सहस्त्रावधी वर्षापासून आदर्शवत राहिले आहे. तथाकथित सुखसमृध्दीला बळी न पडता आपला जीवनसाथीदार एकदा निवडल्यावर त्यावर ज्या कोणत्या आपत्ती येतील त्या आपल्या समजून सावित्रीने ऊन वारा पावसामध्ये सुध्दा सत्यवानाला पूर्ण साथ दिली. लाकडे तोडल्यावर साप चावून त्याला मृत्यू आल्याने सावित्री डगमगली नाही. तिने यमालाही आपल्या चाणाक्ष बुद्धीने व हुशारीने जिंकले आणि आपल्या पतिव्रत्याच्या पुण्याईवर आपल्या पतीला मृत्यूच्या दाढेतून सोडविले. अशी आदर्श पतीपत्नीची पौराणिक कथा आजच्या काळात सुद्धा आदर्शच रहावी.
भगवान गौतम बुद्धांनी वटवृक्षाखाली केलेली साधना आत्मज्ञान बोध होणारी ठरली म्हणून हा बोधिवृक्ष होय. वटवृक्ष दीर्घायुषी आहे म्हणून जीवन वृद्धीसाठी त्याखाली केलेली साधना फलदायी असते. वैज्ञानिक सिद्धांतानुसार अधिक प्राणवायू देणारा वटवृक्ष म्हणजे जीवनदायी होय.
स्त्रीशक्तीने कुटुंबासाठी केलेल्या त्याग भावनेचे प्रतीक होय. या त्यागातूनच कुटुंब व्यवस्था टिकून राहण्यास मदत होते. सामाजिक ऱ्हास कमी होतो.
ही स्त्री शक्तीची ताकत आहे. ती एकवटली जायला पाहिजे. आजच्या काळाची ती गरज आहे. आज स्त्री पुरुष समानता पहायला मिळते. ही दोघांची जबाबदारी असते. आपण जसे सत्यवान सावित्रीचा आदर्श घेतो तसेच महात्मा ज्योतिबा फुले व त्यांची पत्नी पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आजच्या स्त्री आणि पुरुषांनी घेतला पाहिजे.व शिक्षण आणि इतर क्षेत्रात गरुडझेप घ्यायला पाहिजे.कारण स्त्रियांना शिक्षण व समानतेचे अधिकार सावित्रीबाई फुलेनीच दिले आहेत.
परंतू आज सावित्री तर जवळजवळ नामशेषच झाल्या सारख्याच आहेत. आणि सत्यवान तर व्यसनाधीनतेकडे झुकत चाललाय. यातून वेळीच सावध झाले पाहिजे. अन्यथा सामाजिक दुष्परिणाम दिसून येतील. सर्व क्षेत्रात स्त्री पुरुष बरोबरीने दिसायला हवेत मगच कुटुंब व्यवस्था टिकून राहील यासाठी दोन्हीकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. पण प्रत्येकाचा अहंकार,दुखावला जातो. यावर चिंतन होणे अपेक्षित आहे. नात्यात गोडवा टिकायला पाहिजे, पण त्याऐवजी एकमेकांना समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडतो.कुटुंब व्यवस्था नामशेष होण्याची वेळ आली आहे. पतिपत्नी संबंधसुध्दा जिव्हाळ्याचे राहतात की नाही देव जाणे !
आपण सर्वांनी फक्तच परंपरा न पाळता, वडाची भरपूर झाडे लावली पाहिजेत. त्यातून मिळणारा भरपूर प्राणवायू नक्कीच प्रत्येकाचे जीवन शतायुषी करेल यात तिळमात्र शंका नाही.
आपण विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालायलाच हवी.पर्यावरण राखायलाच हवे.फक्त्त परंपरा न जोपसता ती प्रत्येकाच्या कृतीतून दिसायला हवी.
आपण ज्या वटवृक्षाला फळरूपी प्रसाद ठेवतो तो प्रत्येकाने आपल्या मुलाबाळांना खाऊ घातल्यास नक्कीच तो देवाच्या सार्थकी लागेल. व आपल्या अन्नाचा अपमान होणार नाही इतकी आपण दक्षता नक्कीच घ्याल.
आजचे हे वास्तव वटसावित्री पौर्णिमा यानिमित्ताने एक चिंतन आपणा सर्वांपुढे ठेवले आहे. आपली वैचारिक पातळी वाढवून कुटुंब व्यवस्था टिकायला व सामाजिक न्यायस्तर, पर्यावरण राखण्यासाठी हे चिंतन उपयुक्त व्हावे.