पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Scheme) योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 17 व्या हफ्त्याची वाट पाहात होते. मात्र आता शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. आज म्हणजेच 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा 17 वा हफ्ता जमा होणार आहे. म्हणजेच आज शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणआर आहे. देशातील साधारण 9.26 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
*शेतकऱ्यांना आज मिळणार 2000 रुपये*
लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पदभार स्वीकारताच मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली. त्यानंतर 18 जून रोजी शेतकऱ्यांना ही मदत मिळेल, असे जाहीर करण्यात आले होते. सध्या देशातील अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. खते, औषध फवारणी यासाठी शेतकरी पैशांची तजवीज करत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या बँख खात्यात आता दोन हजार रुपये येणार आहेत. त्यामुळे या पैशांची शेतकऱ्यांना फार मदत होणार आहे.
ई-केवायसी करणे गरजेचे, अन्यथा लाभ मिळणार नाही
दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर आपली ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत. फेस ऑथेंटिकेशनच्या (Face Authentication) मदतीने तुम्ही घरी बसूनच ई-केवायसी करू शकता. तसेच देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटरवरदेखील तुम्ही ई-केवायसी करू शकता. ज्या शेतकऱ्यांनी याआधीच ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांना आता पुन्हा एकदा केवायसी करण्याची गरज नाही.