बलिदानातून गोत्रजांचा उद्धार करणारी वासवी माता
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील थानकुसा तालुक्यात पेनुगोंडा नावाचे एक गाव आहे. प्राचीन काळी पेनुगोंडा हे राज्य होते, या राज्यामध्ये राजा कुसुमश्रेष्ठी व राणी कुसुमांबा हे राज्य करत होते. या दांपत्याला बऱ्याच वर्षानंतरही मूल होत नव्हते म्हणून ते आपले गुरु भास्कराचार्य यांना शरण गेले. भास्कराचार्यांनी राजा कुसुमश्रेष्ठीला पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यास सांगितले. आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे कुसुमश्रेष्ठींनी यज्ञ केला व या यज्ञामुळे देवता प्रसन्न झाल्या, त्यांनी यज्ञेश्वरामार्फत प्रसाद दिला आणि त्याचवेळी आकाशवाणी झाली, की हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर कुसुमश्रेष्ठी - कुसुमांबा यांना आपत्य होईल, त्याचवेळी सर्व देवतांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर कुसुमांबा यांनी वैशाख शुद्ध दशमी, वार शुक्रवार, उत्तरा नक्षत्रावर कन्या राशीमध्ये दोन जुळ्यांना जन्म दिला. मुलाचे नाव वीरूपाक्ष व मुलीचे नाव वासवी ठेवण्यात आले. अत्यंत संस्कारी वातावरणात विरूपाक्ष व वासवी हे दोघे हळूहळू मोठे होत होते.
याचवेळी क्षत्रियांचा राजा विष्णुवर्धन हा युद्धामध्ये विजय मिळवून आपल्या राज्यात परत जाताना पेनुगोंडा या राज्यात आला, त्यावेळी राजा कुसुमश्रेष्ठींनी त्यांचे आदरातिथ्य करून विजयी मिरवणूकही काढली. या समयास आपल्या परिवाराची कुसुमश्रेष्ठींनी राजा विष्णुवर्धन यास परिचय करून दिला, त्यावेळेस वासवीला पाहून राजा विष्णुवर्धन प्रभावीत झाला व तो तिच्या प्रेमात पडला. राजा विष्णुवर्धन आपल्या राज्यात परतला खरा, परंतु त्याच्या मनात सातत्याने वासवीबरोबर विवाह करण्याचा विचार घोळत होता. खरे तर विष्णुवर्धन हा राजा विवाहित होता, त्यास पत्नी व आपत्येदेखील होती. तसेच तो वेगळ्या कुळामध्ये - वर्णामधील होता, तरीही वासवीबरोबर लग्न करण्याचा त्याने विचार पक्का करून तशी मागणी राजा कुसुमश्रेष्ठी यांच्याकडे केली.
विवाहाचा प्रस्ताव देऊन राजा विष्णुवर्धन यांनी आपले प्रतिनिधी पेनुगोंडास पाठविले. या प्रस्तावावर विचार करण्यासाठी राजा कुसुमश्रेष्ठीने राजसभा बोलावली. आर्य वैश्यामधील ७१४ गोत्रजांना चर्चेसाठी बोलावण्यात आले. वेगळ्या वर्णामध्ये व विवाहित असणाऱ्या राजा विष्णुवर्धन यास आपली कन्या देऊ नये असे राजा कुसुमश्रेष्ठीला वाटत होते. ७१४ पैकी १०२ गोत्रजांचे प्रतिनिधी कुसुमश्रेष्ठींच्या बाजूने होते तर राजा विष्णुवर्धन यांना विरोध केल्यास ते युद्ध लादतील या भीतीने ६१२ गोत्रजांचे प्रतिनिधी वासवी व विष्णुवर्धन यांच्या विवाहाच्या बाजूने उभे राहिले. राजसभेत एकमत होत नसल्याचे पाहून कुसुमश्रेष्ठींना खूप दुःख झाले. आपली कन्या वासवीचा राजा विष्णुवर्धन यांच्याशी विवाह लावून देण्यास कुसुमश्रेष्ठींनी ठाम नकार दिला. ही बातमी समजताच राजा विष्णुवर्धन याने युद्ध करण्याचा निर्णय घेतला. युद्ध करून वासवीला जिंकून तिच्याशी विवाह करण्याचा विष्णुवर्धनने निश्चय केला. ही बातमी पेनुगोंडा येथील नगरात पसरल्यानंतर राजा व प्रजा चिंताक्रांत झाले. ही बातमी समजल्यानंतर आपल्यामुळे आपल्या राज्यावर येणाऱ्या संकटाचा विचार करून वासवीने एक वेगळीच योजना आखली. तिने आपली ही योजना वडिलांना समजावून सांगितली व जे १०२ गोत्रजांचे प्रतिनिधी कुसुमश्रेष्ठींच्या बाजूने उभे राहिले, त्यांना देखील ही योजना सांगण्यात आली. राजा कुसुमश्रेष्ठींनी वासवीच्या आदेशाचे पालन करण्याचा हुकूम काढला. सर्व नगरांमध्ये सजावट करण्यात आली.
कुसुमश्रेष्ठी व १०२ गोत्रजांचे प्रतिनिधी सपत्निक गावातील नगरेश्वर मंदिराजवळ जमा झाले. तेथून सर्वजण वासवीच्या सांगण्यावरून गोदावरी नदीवर आले. तेथे वासवीच्या आदेशाने आधीच १०३ अग्नीकुंडांची तयारी करण्यात आली होती. मधल्या अग्नीकुंडासमोर वासवी स्वतः उभी राहिली आणि १०२ गोत्रज दांपत्यांना प्रत्येक अग्निकुंडासमोर उभे राहण्यास सांगितले.
माझ्यामुळे युद्ध लादले जाऊन आपल्या नगरातील प्रजेला त्रास होणार असेल व वेगळ्या वर्णांमध्ये माझा विवाह करून जर परंपरा खंडित होणार असेल तर त्यापेक्षा मी प्राणार्पण करून हे संकट दूर करणार आहे. माझा व गोत्रजांचा स्वाभिमान टिकविण्यासाठी मी प्राणार्पण करणार आहे. मी स्वतः अग्नीकुंडात उडी मारणार आहे, आपणही उडी मारण्यास तयार आहात का? असा जेव्हा वासवीने इतरांना प्रश्न केला, तेव्हा सगळे विचारात पडले. सर्वांच्या लक्षात आले, की वासवी ही एक सामान्य मुलगी नाही. तिच्यामध्ये दैवी शक्ती वास करीत आहे. तिला आपले विश्वरूप दाखवायचे आहे. वासवीने सांगितले, की मी आदिशक्तीचा अवतार आहे, मीच महिषासुराचा वध केला आहे, शुंभ आणि निशुंभ राक्षसाचाही वध मीच केला आहे, त्रेतायुगामध्ये मी सीता देवीचे रूप धारण केले होते, द्वापारयुगात यशोदेच्या पोटी दुर्गा या नावाने मीच जन्म घेतला होता, या कलियुगामध्ये स्त्रियांच्या पावित्र्याचे रक्षण करण्याचा मी निश्चय केला आहे, म्हणूनच मी वासवी ब्रह्मचारिणी या नावाने आर्य वैश्य कुळामध्ये जन्म घेतला आहे. वासवीचे मूळ रूप पाहून सर्वांनी तिला साष्टांग नमस्कार केला.अग्नीकुंडात उडी घेऊन प्राणार्पण करण्यापूर्वी तिने सांगितले, माझ्या या योजनेची माहिती मिळताच विष्णुवर्धन राजाचा नाश होईल. माघ शुद्ध द्वितीया या दिवशी माता वासवीने अग्निकुंडात उडी घेऊन प्राणार्पण दिले. त्याचबरोबर १०२ गोत्रज वैश्य दांपत्यांनी ईश्वरांचे चिंतन करीत अग्निकुंडाला प्रदक्षिणा मारली व प्रसन्न चित्ताने वासवीप्रमाणे अग्निकुंडात उड्या घेतल्या. तेव्हापासून १०२ गोत्रजांना आर्य वैश्य म्हणून ओळखले जाते.
वासवीसहित १०२ गोत्रजांनी प्राणार्पण दिल्याची वार्ता विष्णुवर्धन राजास कळताच त्याला धक्का बसला. त्याच्या हृदयाचे व डोक्याचे तुकडे - तुकडे झाले, त्याची जीवनयात्रा संपुष्टात आली. त्याने जसे कर्म केले तसे त्याला फळ मिळाले. विष्णुवर्धन राजाचा अहंकाराने अंत झाला. ही बातमी कळताच त्याचा पुत्र नरेंद्र त्वरित पेनुगोंडा नगरीत आला व त्याने वासवीचा बंधू विरूपाक्षच्या पायावर लोळण घेतली. वीरुपक्षाने त्यास जवळ घेऊन अलिंगण दिले. आता तरी धर्माचे पालन कर असे वचन नरेंद्र याच्याकडून घेतले. त्यानंतर गुरु भास्कराचार्यांनी विरुपाक्षास काशीला जाऊन पित्याचे पिंडदान करण्यास सांगितले. तेथून आल्यानंतर नगरेश्वर मंदिरामध्ये वासवी कन्यका परमेश्वरी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली व त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विरूपाक्ष यास पेनुगोंडा राज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला.
श्री.वासवी कन्यका परमेश्वरी देवीने आपल्या प्राणाचे बलिदान देऊन स्त्री कुळाचे, स्त्रीच्या पावित्र्याचे, स्त्रीच्या सन्मानाचे, आपल्या कुळाचे व आपल्या गोत्रजांचे रक्षण केले व बलिदानातून देखील आपण आपल्या गोत्रजांचा उद्धार करू शकतो याचा आदर्श घालून दिला.आज वैशाख शुद्ध दशमी म्हणजेच श्री.वासवी कन्यका परमेश्वरी देवीच्या जयंतीचा दिवस. श्री वासवी कन्यका परमेश्वरी देवीला शतशः नमन!
संकलन-
डॉ.सचिन वसंतराव लादे,पंढरपूर