अनधिकृत चिमणी,विमानसेवा व बोरामणी विमानतळ बाबत खोट्या माहिती द्वारे धर्मराज काडादी करीत आहेत लोकांची दिशाभूल.- डॉ. संदीप आडके
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूरची निवडणूक ही मुख्यत्वे करून सोलापूरची विमान सेवा व त्यामुळे रखडलेला सर्वांगीण विकास याच एका मुद्द्याच्या भोवती होणार आहे परंतु सिद्धेश्वर साखर कारखान्याचे धर्मराज काडादी हे मीडियामध्ये व नुकत्याच एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून लोकांची दिशाभूल करीत आहेत. सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडावी अशी कोणत्याही कोर्टाची ऑर्डर नसताना तसेच विमान प्राधिकरणाने एनटीपीसीची चिमणी आडवी येत असल्याने ही चिमणी पाडू नये, आम्हाला स्टे मिळत असताना सुद्धा घाई करून सुडाच्या राजकारणातून चिमणी पाडली. चिमणी पाडल्यावर होटगी रोड विमानतळ सुरू होणार ही अफवा आहे. सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पाडून इतर कारखाने चालतील, चिमणी पाडल्यामुळे लोकांमध्ये चिड निर्माण झाली आहे व ते त्याचा वचपा निवडणुकीत काढतील. चिमणीचा अडथळा नसताना एका बाजूनेच विमानसेवा सुरू करता येत असताना चिमणी पाडली गेली व हे काम सरकारने केले आहे अशा चुकीच्या बातम्या पसरवीत आहेत.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ९२ मीटरची को- जनरेशनची चिमणीला डीजीसीए, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सोलापूर महानगरपालिकेची बांधकाम परवानगी नव्हती त्यामुळे
२०१७ मध्येच ती पाडण्याचे प्रयत्न झाले परंतु तेव्हापासून काडादींनी सर्वच पक्षांचा वापर करून १५ जून २०२३ पर्यंत या अनाधिकृत चिमणीला अभय मिळवले होते परंतु सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून आम्ही कोर्टात लढा दिल्यामुळे प्रशासनाला ती पाडावी लागली परंतु त्याचे खापर सध्या ते दुसऱ्यांवर फोडत आहेत. चिमणी पाडकाम रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यांची याचिका फेटाळण्यात आलेली होती व २१ डिसेंबर २०२० ला एक महिना चिमणी पाडकाम करू नये असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश होते .डिसेंबर २०१९ मध्येच डीजीसीएने जिल्हाधिकाऱ्यांना चिमणीचा अडथळा दूर करण्याबाबत सांगितले होते .
१५ जून २०२३ रोजी चिमणी पडल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टीची पूर्तता करून होटगी रोड विमानतळ सुरू करता आले असते परंतु बऱ्याच वर्षापासून रनवेची देखभाल झाली नसल्यामुळे व हे विमानतळ अत्याधुनिक करण्यासाठी हा वाढीव कालावधी लागलेला आहे व सोलापूर विचार मंचच्या डॉ. संदीप आडके यांना खुद्द प्रधानमंत्री कार्यालयातून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत येथून विमानसेवा सुरू होईल याचे पत्र यापूर्वीच दिल्या गेलेले आहे त्यामुळे सोलापूरची विमान सेवा सुरू करण्यात कोणत्याही पक्षाचा हातभार नाही व चिमणी पाडकामासाठी कोणत्याही पक्षाने सोलापूर विचार मंचला पाठिंबा दिलेला नाही. हा अभुतपूर्व लढा फक्त कायद्याच्या चौकटीत बसवून सोलापूर विचार मंचाने यश प्राप्त केलेले आहे. होटगी रोड विमानतळ हे वाढू शकत नाहीत असे काडादी सांगतात परंतु सध्याच्या रनवेची लांबीच २.१ किलोमीटर आहे यावर ७२ आसनी विमाने ये जा करू शकतात व त्यासाठी फक्त १.३ किलोमीटरचा रनवे लागतो. मागील महिन्यातच विमानतळ प्राधिकरणाने सिद्धेश्वर कारखान्याने अतिक्रमण केलेली साडेतीन एकर जमीन सुद्धा ताब्यात घेतलेली आहे त्यातही काडादी यांना कोर्टामध्ये अपयश आलेले आहे.
चिमणी पाडकामांमध्ये जेवढे प्रयत्न केले तेवढे प्रयत्न बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी केले असते तर ते विमानतळ सहा महिन्यात सुरू झाले असते असे काडादींचे म्हणणे आहे परंतु बोरामणी विमानतळ हे २००८ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेले होते परंतु त्यामध्ये माळढोक साठी आरक्षित असलेली ३३ हेक्टर जमीन असल्याने ते विमानतळ यापुढे कदापिही कार्यान्वित होऊ शकणार नाही. माळढोक ही जगातील अतिशय संवेदनशील व लुप्त होणारी पक्षांची प्रजाती असल्यामुळे त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठीच उच्च न्यायालयाने पावले उचललेली असताना व या परिसरात माळढोकचा सतत वावर असताना, माळढोक संवर्धनासाठी सोलापुरात प्रयत्न होत असताना ही जागा कदापिही विमानतळास मिळणार नाही. परंतु ही गोष्ट हे विमानतळ येथे आणणाऱ्यांना माहिती नव्हती का? परंतु लोकांची दिशाभूल करून या परिसरातील जागांना मोठ्या भावाने विकून लोकांची फसवणूक करण्यात आलेली आहे. सिद्धेश्वर कारखाना आपल्या शेतकऱ्यांना वेळेवर परतावा देऊ शकत नाही किंवा आपल्या कामगारांचे पगार देऊ शकत नाही व कोट्यावधी रुपयांच्या कर्जाखाली बुडालेला असताना काडादी अशा अफवा पसरून लोकांची दिशाभूल करीत आहेत व सिद्धेश्वरांच्या नावे घाणेरडे राजकारण करीत आहेत. परंतु केवळ सोलापुरात विमानसेवा नसल्याने येथे प्रगती होऊ शकली नाही व गेल्या काही वर्षात येथून विस्थापित झालेले लोक नक्कीच ७ मे रोजी सोलापुरात येऊन ज्या निष्क्रिय लोकांमुळे सोलापूर भकास झाले ,जे लोक अनधिकृत चिमणी वाचवण्यामध्ये सक्रिय होते त्यांना मतदानातून धडा शिकवतील असे चित्र आता स्पष्ट दिसत आहे.