पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अलीकडच्या काळामध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईलच्या अतिरेकी वापराचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या मन - मेंदू - डोळे व एकूणच शरीरावर होत आहे. त्याचबरोबर कुटुंबातील संवादही संपत चालला आहे. अनेक अनावश्यक गोष्टी दुर्दैवाने यातून उद्भवत आहेत, अशा परिस्थितीमध्ये एक कुटुंब म्हणून कुटुंबाचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी घरामध्ये तरी मोबाईलचा वापर कमीत कमी झाला पाहिजे असे अनेक तज्ज्ञांनी संशोधनाअंती सांगितले आहे. मोबाईलच्या अतिवापरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अलीकडेच झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये देखील चिंता व्यक्त करण्यात आली होती. मोबाईलचा अतिरेकी वापर होतो हे आपण सारेच मान्य करतो, परंतु यापासून दूरही राहू शकत नाही अशी आपल्या सर्वांची अवस्था झाली आहे. त्यामुळेच मोबाईल हा चिंतेचा विषय बनला आहे.
कुटुंबाचं स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने एक अनोखी योजना प्रत्यक्षात आणावी असा विचार करुन एक योजना बनविली आहे.
किमान चार मोबाईल बसतील असा एक प्लॅस्टिकचा ट्रे घ्यायचा. त्यावर मोबाईल पार्किंग एरिया अशा नावाचे स्टिकर लावावयाचे. मोबाईल पार्किंगच्या वेळा म्हणून काही गोष्टींचा त्यावर उल्लेख करावयाचा. उदा. जेवण करताना, पाहुण्यांशी बोलताना, घरातील व्यक्तींशी संवाद साधताना, घरातील सर्व व्यक्ती एकत्र बसल्यानंतर, झोपताना. याप्रसंगी प्रत्येकाने आपला मोबाईल त्या ट्रे मध्ये ठेवावा असे अपेक्षित आहे.
अशा प्रकारचा प्रयोग प्रत्येकाने करावा असे म्हटले तर याची अंमलबजावणी कितपत होईल याबाबत शंका वाटत होती, म्हणूनच श्रीराम उत्सव समितीच्या माध्यमातून अक्षय तृतीया व परशुराम जयंतीच्या मुहूर्तावर श्रीराम उत्सव समितीच्या वतीने स्टिकर लावलेले असे ट्रे शंभर कुटुंबांना भेट म्हणून देण्यात आले.
याबाबत आपल्या काही सूचना असल्यास कृपया आपण नोंदवाव्यात व हा उपक्रम आपल्या घरीही राबवावा व इतरांनाही राबवण्यास प्रवृत्त करावे ही विनंती.
डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर.मो.क्र.७५८८२१६५२६