पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज तसेच अन्य संताच्या पालख्याबरोबर आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूरात मोठ्या संख्येने वारकरी, भाविक येतात. यंदाची आषाढी यात्रा आरोग्य संपन्न पूर्ण व्हावी. तसेच निर्वघ्नरीत्या पार पडावी यासाठी प्रशासनातील सर्वच विभागांनी वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी- सुविधांबाबत दक्षता घेवून सुनियोजित आणि सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिल्या.
आषाढीवारी पुर्वनियोजनाबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, परिविक्षाधिन सहा.पोलीस अधिक्षक शुभम कुमार, तहसिलदार सचिन लंगुटे, सहा. गटविकास अधिकारी राजाराम भोंग, सां.बा. कार्यकारी अभियंता अमित निमकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे श्री. घोडके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक महेश सुडके, भीमा पाटबंधारे विभागाचे उप-कार्यकारी अभियंता जे.व्ही. इंगवले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूंजकर, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ठाकूर म्हणाल्या, आषाढी यात्रा सोहळा पावसाळ्याच्या कालावधीत पार पडत असल्याने यावेळी वादळ, वारे येण्याची शक्यता लक्षात घेवून वारकरी व भाविकांच्या सुरेक्षेसाठी पालखी मार्गावरील तसेच पंढरपूर शहरातील बेकायदा होर्डींग तात्काळ काढण्यात यावेत तसेच अधिकृत होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील रस्त्याची कामे तात्काळ पुर्ण करावीत. वारकरी भाविकांना पालखी तळांवर, मार्गावर भाविकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळेल यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करावे. पालखी तळांवर आवश्यक प्रमाणात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. पंढरपूर शहरातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. तसेच गटारी नाले यांची स्वच्छता करावी. धोकादायक इमारती धारकांना तात्काळ नोटीस द्यावी. मोफत पार्किंग बाबत ठळक अक्षरात बोर्ड लावावेत तसेच त्या ठिकाणी उपलब्ध सोयी-सुविधांची माहिती व ठिकाणे याबाबत फलक लावावेत. गर्दीच्या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी. आरोग्य विभागाने वारीत येणाऱ्या भाविकांची संख्या तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा.
अन्न व औषध विभागाने पालखी मार्गावरील तसेच शहरातील खाद्यपर्थांच्या दुकानाची तपासणी करण्यासाठी पथके नेमावेत. तसेच पालखी मार्गावर सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वारकरी भाविकांसाठी अन्नदान केले जाते त्याची तपासणी करावी. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी तळांवर मुरमीकरण करावे. वीज वितरण कंपनीने पालखी तळावर व मार्गावर वीज वाहक तारांचे अडथळे येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अन्न विषबाधा होऊ नये यासाठी मठात, धर्मशाळेमध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत जनजागृती करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी नगरपालिका, महसूल, पोलीस विभाग, महावितरण, रेल्वे, एसटी महामंडळ मंदिर समिती , पाणी पुरवठा तसेच संबधित विभांगानी आतापासूनच वारीचे नियोजन करावे. कालबद्ध रीतीने नियोजन पूर्ण करून वारीसाठी सज्ज राहण्याच्या सूचनाही अप्पर जिल्हाधिकारी ठाकूर यांनी यावेळी केल्या.