मर्यादा पुरुषोत्तम...
प्रभू रामचंद्राचा अवतार तर माणसाला माणसासारखे कसे वागावे हे शिकविणाराच आहे. एका मर्यादेत राहून उत्तम पुरुष कसे बनता येते याचा आदर्शच प्रभुरामरायांनी घालून दिला आहे, म्हणून तर त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते. श्रीरामचंद्रांचा वारसा सांगणारे आपल्या धर्म व संस्कृतीतील अनेक लोक प्रभू रामचंद्रांचा मर्यादा सांभाळून वागण्याचा आदर्श मात्र विसरून गेले आहेत, त्यामुळेच भारतामध्ये आज माणुसकीला-मानवतेलाच ग्लानी येत असल्याचे अनुभव येत आहेत.
प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार हा मानवी अवतार का मानला गेला आहे? एका माणसाला आपल्या संसारांमध्ये कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, नातेसंबंधांमध्ये कोणते ताण-तणाव उद्भवू शकतात व संसाराचा गाडा पुढे हाकत असताना त्याला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो त्या सर्व गोष्टी प्रभू रामचंद्रांच्या जीवनात त्यांना उपभोगाव्या लागल्या. या सर्व प्रसंगांमध्ये प्रभू रामचंद्र प्रत्यक्षात भगवान विष्णूंचे अवतार असतानादेखील त्यांनी कोणत्याही प्रकारच्या देवत्वाच्या शक्तीचा अथवा चमत्कारांचा उपयोग न करता या सर्व समस्या-संकटांच्या प्रसंगांना एक माणूस म्हणूनच सामोरे गेले व एका मर्यादेत राहूनदेखील या सर्व समस्या-संकटांचा सामना करून कशी यशप्राप्ती करता येऊ शकते याचा आदर्श आपल्या आचरणाने घालून दिला, म्हणूनच प्रभू श्रीरामचंद्र हे मानवजातीसाठी आदर्श असे व्यक्तिमत्व आहे.
प्रभू श्रीरामचंद्र हे एक आदर्श पुत्र, पती, बंधू, पिता व आदर्श शिष्य होते. गुरु विश्वामित्रांनी आवाहन करताच आपल्या पित्याच्या आज्ञेने वनामध्ये ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या असुरांचा नाश करण्यासाठी तत्परतेने जायला निघालेले रामराय हे आदर्श शिष्य होते. आदर्श पुत्र असल्यामुळेच प्रभू रामरायांनी आपल्या सावत्र आईचा व वडिलांच्या आज्ञेचा स्वीकार करून राज्यपद सोडून वनवास स्वीकारला. या प्रसंगामध्ये रामरायांनी वेगळी भूमिका घेतली असती तर कदाचित रामरायांचे वेगळे व्यक्तिमत्व जगासमोर आले असते. परंतु या प्रसंगांमध्ये रामरायांनी एक आदर्श पुत्र असल्याची मर्यादा सांभाळली व आई-वडिलांनी केलेल्या आज्ञेचा स्वीकार केला. नातेसंबंधांमध्ये अथवा कुटुंबामधील व्यक्तींच्या स्वार्थी वागण्यामुळे जर काही तेढ निर्माण झाली तर एक माणूस म्हणून प्रत्येकाने रामरायांप्रमाणे मर्यादा सांभाळली तर निश्चितच आज घराघरांमध्ये निर्माण होणारे महाभारत आपण टाळू शकतो. कुटुंबव्यवस्था ढासळली तर समाजाचे व देशाचे अधःपतन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभुरामरायांनी आपले कुटुंब तुटू नये यासाठी प्रत्यक्ष राज्यपदाचा त्याग केला.
प्रभू श्रीरामचंद्र आदर्श शासक, पालक व आदर्श राज्यकर्ते होते. राजा म्हणून असणाऱ्या राजधर्माचे त्यांनी आयुष्यभर पालन केले. सर्व प्रकारच्या मर्यादा सांभाळून आपल्या रयतेला सुखी-समाधानी व सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी कार्य केले. प्रजेतील सामान्यातील सामान्य व्यक्तीच्या बोलण्याचा त्यांनी कसा आदर केला हे आपल्याला अनेक प्रसंगातून दिसून येते. गैरसमजातून एका सामान्य व्यक्तीने केलेल्या विधानाचा सुद्धा रामरायांना आदर करावासा वाटला व प्रजेला जी गोष्ट मान्य नाही ती गोष्ट मीदेखील खपवून घेणार नाही असा पवित्रा घेत त्यांना माहीत असूनदेखील आपल्या पवित्र असणाऱ्या पत्नीला त्यांनी जड अंतःकरणाने पुन्हा एकदा वनवासात पाठवले, म्हणजे रामराय हे रयतेचा आवाज ऐकणारे व त्यांच्या मतांचा आदर करणारे आदर्श पालक तसेच राज्यकर्ते होते. या प्रसंगामध्येदेखील अमर्याद सत्ता असणाऱ्या व अपवाद वगळता सर्व प्रजाजनांचा प्रचंड विश्वास असणाऱ्या रामरायांनी मर्यादा पालन करत एका सामान्य व्यक्तीच्या मताचा आदर केल्याचे दिसून येते.
जनसेवेचे ढोंग घेऊन सत्तेवर येणारी व वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून राजकारण करणारी मंडळी मात्र कोणत्याच मर्यादांचे पालन करताना दिसून येत नाहीत. रयतेचा आवाज ऐकायला या मंडळींचे कानही उघडे नाहीत व रयतेचे होणारे हाल पाहायला दुर्दैवाने डोळेही उघडे नाहीत. हा देश माझा आहे, हा समाज माझा आहे ही भूमिका आजचे राजकीय पुढारी दुर्दैवाने विसरून गेले आहेत. राजकीय पुढाऱ्यांनी सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडल्या असल्यामुळेच आज समाजमनाची अशी विचित्र धारणा झाली आली आहे.
प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन खरोखरच राज्य करायचे ठरवले तर भारतासारखी मानसिक जडणघडण झालेली भूमी जगाच्या पाठीवर दुसरी कुठेही नाही, त्यामुळे या देशातील राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी व समाजधुरीणांनी रामरायांच्या मर्यादांचे पालन करून त्यांचा आदर्श घ्यावयाचा ठरविले तर या भारतामध्ये सर्व जाती-धर्मांच्या व सर्व उपासना-पंथांच्या लोकांना सुखाने-गुण्यागोविंदाने राहण्यायोग्य रामराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणूनच प्रभुरामचंद्रांचा मर्यादापुरुषोत्तम असा केवळ उल्लेख न करता त्यांचा तो आदर्श प्रत्येकाने आचरणात आणला पाहिजे.
- डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर.