पंढरपूर प्रतिनिधी
शिधावाटप केंद्रांवर ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा जिनसांबरोबर साडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सोलापूर जिल्ह्यात साड्या वितरणासाठी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने साड्यांचे वितरण थांबवण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना शिधावाटप केंद्रांवरील साड्यांसाठी किमान चार महिने वाट पाहावी लागणार आहे.
राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ देताना साडी देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील विविध शिधावाटप केंद्रांतून होणार होती. अंत्योदय घटकांत मोडणा-या सर्व लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका एक साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी साड्या उपलब्ध झाल्या आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वितरण सुरू करण्यात आले असले तरी काही ठिकाणी साड्या विलंबाने पोहोचल्याने साडी वितरण प्रक्रिया उशिराने सुरू झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि साड्यांच्या वितरणावर गदा आली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता साड्यांचे शिधावाटप केंद्रांवरील वितरण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता ६ जूननंतर आचारसंहिता शिथिल झाल्यानंतरच साडी वितरणाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.