मुंबई प्रतिनिधी
माझी मातृभाषा सिंधी असून मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात मार्गदर्शकाच्या मदतीशिवाय २००६ साली मी पीएचडी केलं आहे. विषय होता 'एकोणिसाव्या शतकातील निबंधवाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन'. प्रबंधाला प्रा. अ. का. प्रियोळकर हा उत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार प्राप्त झाला. या यशाची दखल मराठीतील सर्व वर्तमानपत्रांनी तसंच 'ई' मराठी (कलर्स) आणि सह्याद्री वाहिनीने घेतली. सोलापूर येथील विठाबाई पसारकर स्मृत्यर्थ दिला जाणारा संशोधनासाठीचा पुरस्कार ऑगस्ट २०१८मध्ये मिळाला. मृण्मयी हा पारितोषिकप्राप्त दिवाळी अंक १९९३पासून मी सहा वर्षं एकहाती संपादित - प्रकाशित केला. पहिल्याच अंकाला बार्शी येथील सीतादेवी सोमाणी प्रतिष्ठानचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. श्री. अरुण कांबळे यांच्या चीवर, युगप्रवर्तक डॉ. आंबेडकर आणि चळवळीचे दिवस या वैचारिक पुस्तकांचं १९९६ साली, तसंच सुमती इनामदार यांच्या 'दिंडी आणि चांदोबाचा अंगरखा' या काव्यसंग्रहाचं २००८ साली संपादन - प्रकाशन केलं. अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांत माझी पुस्तक परीक्षणं, लेख, कविता, नामवंतांच्या मुलाखती आणि पत्रं प्रसिद्ध झाली आहेत.
अनेक शाळा - कॉलेजेसमध्ये मी शुद्धलेखनविषयक कार्यशाळांचं आयोजन केलं आहे तसंच अनेक प्रतिष्ठित प्रकाशन संस्थांत मुद्रितशोधन आणि संपादन साहाय्य केलं आहे. राज्यस्तरीय अनेक निबंधस्पर्धांत मी प्रथम, द्वितीय क्रमांकाची पारितोषिकं मिळवली. माझ्या वरील 'ओळखी'ला अभूतपूर्व अशा प्रदीर्घ संघर्षाची आणि तपश्चर्येची जोड आहे. माझ्या वाट्याला अत्यंत रेअर असं दुर्दैवी आयुष्य आलं. त्याबद्दल निर्वासित हे आत्मकथन मी जून २०२३मध्ये प्रसिद्ध केलं आहे. प्रकाशक मीच आहे. हे पुस्तक तुम्हाला हवं असल्यास 7498380403@sbi या UPI id वर ४०० रुपये पाठवावेत. टपालखर्च वेगळा नाही.