पंढरपूर प्रतिनिधी
“भूगोलाच्या अभ्यासात भूरूपे, हवामान, लोकसंख्या, संस्कृती यांचा अभ्यास केला जातो. जगाची लोकसंख्या दोन हजार आकरानुसार आठशे पन्नास कोटी होती. ती आता झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. भूगोलशास्त्रात समाज आणि संस्कृतीचा अभ्यास केला जातो. मानव हा समाजशील प्राणी आहे. खंडानुसार संस्कृती बदलते. या बदलाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो.” असे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुरेश पवार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित भूगोल दिनाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. बाळासाहेब बळवंत हे होते.
प्रा. डॉ. सुरेश पवार पुढे म्हणाले की, “भूतकाळ आणि भविष्यकाळावर आपण नेहमी जगत असतो. आर्थिक भूगोलाची सुरुवात स्वतः पासून होते. भूगोल तज्ञ नेहमी कुठे काय मिळते ? याचा अभ्यास करत असतात. स्थानिक संसाधने आणि जागतिक संसाधने यांचा अभ्यास केला जातो जी. पी. एस.च्या माध्यमातून आपणास स्थान निश्चित करता येते. आधुनिक भूगोलात बदल होताना आपणास दिसून येतात. गरज ही शोधाची जननी आहे. भारतामध्ये प्रांतवार भाषारचना पहावयास मिळते. भूगोलाच्या शाखा प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोलात विभागाला गेला आहे. यामध्ये युवकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.”
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. बाळासाहेब बळवंत म्हणाले की, “पृथ्वीला वाचवले पाहिजे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन केले पाहिजे. सध्या जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम समोर येत असून निसर्गातील असमतोल वाढत चालला आहे. अभ्यासकांनी विविध घटकांचा अभ्यास करताना पृथ्वीच्या संरक्षणासाठी अधिक व्यापक रीतीने काम केले पाहिजे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. भगवान नाईकनवरे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास लिंगडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भारत सुळे, प्रा. धनंजय कदम, डॉ. उत्तम माळी, प्रा. हर्षकुमार घळके, प्रा. औदुंबर कुसमडे, डॉ.प्रविण उघडे, प्रा. सचिन सोनकांबळे व प्रा. सौ वर्षा नाईकनवरे यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. चंद्रकांत काळे यांनी मानले.