पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील पश्चिम भागातील गावांमधील पिके ही पाण्यावाचून करपु लागली आहेत, शेतकऱ्यांसमोर आपली हिरवी पिके व जनावरांचे पोषण करणे ही मोठी समस्या निर्माण झाली आहे,त्यामुळेच आता त्या भागातील शेतकरी देखील पाण्याच्या आवर्तनासाठी आक्रमक झालेला पहायला मिळत आहे.
पंढरपूर तालुक्यातील पश्चिम भागातील पंढरपूर सातारा रोडवर गादेगाव सातारानाला येथे शेतकर्यांकडुन शेतीपिकाला 3 डी कालव्यामार्फत पाण्याचे आवर्तन सोडले जावे या मागणीसाठी रास्तारोकोचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांसह शेतकर्यांची देखील मोठी गर्दी यानिमित्ताने झाली होती.
यावेळी बोलताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी, प्रशासनाने शेतकरीप्रश्नांवर गांभीर्य बाळगावे व पाणी सोडण्याचा निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व त्यांची पिके व पशुधन वाचवण्याचे काम करावे,शेतकऱ्यांसमोर असलेल्या या भीषण संकटात प्रशासनाने शेतकरी हिताची भुमिका न घेतल्यास येत्या काळात आक्रमक आंदोलन करू असा इशारा दिला,
तर शेतकरी नेते समाधान फाटे यांनी बोलताना, आजपर्यंत प्रत्येक वर्षी या प्रश्नांवर आम्हाला आंदोलने करावी लागतात उपोषण करावे लागते तरिही प्रशासन सुस्त आहे, तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे आपले कर्तव्य विसरलेत, त्यांना जनतेचे काही पडलेले नाही जनता देखील त्यांना भविष्यात बेदखल निश्चीत करेल,आम्ही कालवा सल्लागार समितीचा धिक्कार करतो, समितीने पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा प्रशासनास पाणी झुकवून पाणी मिळवून दाखवू असा निर्धार यावेळी व्यक्त केला.
यावेळेस बोलताना शिवसेना युवासेनेचे रणजित बागल यांनी लोकप्रतिनिधींना धारेवर धरत पाण्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी चकार शब्द काढत नाहीत अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधींना जनता पाणी पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, आगामी काळात सर्वांनी मिळुन ही पाण्याची लढाई लढुया व हक्काचे पाणी मिळवुया असे प्रतिपादन केले..
यावेळी उपरीचे उपसरपंच श्रीनिवास नागणे,भाजपा जि.उपाध्यक्ष गणेश बागल, राष्ट्रवादी (अजित पवार गट) महिला जिल्हाध्यक्षा साळुंखे ,भंडीशेगावचे पार्थ सुरवसे,वाखरीचे शिवसेनेचे संजय घोडके यांनीही आपल्या भाषणांमधून पाण्याच्या भीषण संकटाची दाहकता विषद केली. यावेळी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांसह गादेगाव, उपरी, वाखरी, भंडीशेगाव, खेडभाळवणी, पळशी, शेळवे, यांसह इतर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर मुख्यमंत्र्यांचे रिकाम्या बाटल्यांनी स्वागत करू -
येत्या चार दिवसात या पाणी प्रश्नांवर तोडगा काढुन शेतकर्यांचे "समाधान" न केल्यास मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य पंढरपूर दौर्यात सनदशीर मार्गाने आंदोलनाच्या भूमिकेतून रिकाम्या बाटल्या दाखवुन स्वागत करू असा इशारा शिवसेना उ.बा.ठा चे युवानेते रणजित बागल यांनी दिला.