सोलापूर प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० जानेवारी रोजीच्या सोलापूर दौऱ्यात सर्वप्रथम सोलापूर होटगी रोड विमानतळाचे उद्घाटन करा व येथून कमीत कमी सोलापूर ते मुंबई अथवा सोलापूर ते हैदराबाद अशी 'उडान' योजनेअंतर्गत पहिली विमान सेवा सुरू करा असे निमंत्रण सोलापूर विचार मंचच्या डॉ.संदीप आडके यांनी पाठवले आहे.
होटगी रोड विमानतळातील अडथळा असणारी सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदा चिमणी पाडून आज साडेसहा महिने उलटून गेले तरीसुद्धा संबंधित प्रशासन व येथील लोकप्रतिनिधींना विमानसेवा सुरू करता आली नाही. या सोलापुरात १८ तासात २५ किलोमीटरचा सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग बनवून विक्रम केला गेला. गेल्या १८ महिन्यात आयोध्या येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा करून त्याचे उद्घाटन सुद्धा आपण केले, परंतु सोलापूर सारख्या अत्यंत महत्त्वाच्या शहराला हक्काच्या विमानसेवे पासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. सोलापूर हे मँचेस्टर ऑफ ईस्ट, रेडीमेड गारमेंट व मेडिकल हब ,पाच तीर्थक्षेत्रांचे आध्यात्मिक पर्यटन स्थळ तसेच 'भारताचे दळणवळणाचे जनक' शेठ वालचंद दोशी ,डॉ.द्वारकानाथ कोटणीस ,डॉ. विष्णू वैशंपायन ,कै. मल्लाप्पा वारद अशा दिग्गजांच्या व चार हुतात्म्यांच्या सोलापूर शहरात आज विमानसेवा उपलब्ध नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्याचबरोबर येथील स्मार्ट सिटी मधील भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराने माखलेले सार्वजनिक परिवहन , रखडलेले दोन उड्डाणपूल व 'नीओ मेट्रो' प्रोजेक्ट व आपण आपल्या मागील भेटीमध्ये आश्वासन दिलेल्या चांगला पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक स्वच्छता या बाबींचा कसा बोजवारा उडाला आहे याची प्रत्यक्ष माहिती घ्यावी असे तमाम ५० लाख सोलापूरकरांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.