प्रशिक्षण हे कर्मचाऱ्यांची गतिमानता अचूकपणा वाढवण्यासाठी महत्त्वाचे
- मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे
पंढरपूर प्रतिनिधी
‘कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गतिमानता आणि अचूकता वाढविण्यासाठी पायाभूत प्रशिक्षण हे महत्त्वाचे असते. कर्मचारी हा प्रशासनाचा आरसा असतो. त्यामुळे शासन कारभारात गतिमानता आणि लोकाभिमुखपणा येण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित असावा.’ असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘सोलापूर जिल्हा परिषद’ व ‘राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या ‘पायाभूत उजळणी प्रशिक्षण’ कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे या बोलत होत्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी रोंगे, प्रकल्प अधिकारी शिवाजीराव पवार, प्रशिक्षक अजित देशपांडे, एस. बी. गोपाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे म्हणाल्या की, ‘बदलत्या काळानुसार कर्मचारी हा नवीन तंत्रज्ञानाशी जोडला पाहिजे आणि आपण करत असलेल्या कार्यामध्ये अचूकता आणि गतिमानता आली पाहिजे. याकरिता सातत्याने प्रशिक्षण झाली पाहिजे. ग्रामीण भागातील लोकांना नियोजित वेळेत आणि दर्जेदारपणे मिळाल्या पाहिजेत ही प्रशासनाची जबाबदारी आहे. म्हणूनच अशा पद्धतीची प्रशिक्षणे सातत्याने झाली पाहिजेत. दररोजच्या कार्यालयीन कामकाजामध्ये स्पष्टता यावी. तसेच नवीन शासन निर्णय परिपत्रक याचा सखोल अभ्यास करून प्रशासन गतिमान झाले पाहिजे याकरिता हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. सदर प्रशिक्षणानंतर सर्व कर्मचाऱ्यांची परीक्षा जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतली जाणार आहे.’ असेही त्यांनी सांगितले. सदर प्रशिक्षणामध्ये अजित देशपांडे यांनी जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम, विभागीय चौकशी प्रक्रिया व होणाऱ्या चूका सेवा शिस्त व अपिल नियम, यशदाचे प्रशिक्षक एस.बी.गोपाळे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम, ५ वा, ६ वा व ७ वा वेतन आयोग तर शंका समाधान याविषयी माहिती अधिकार तज्ञ शिवाजीराव पवार यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीचे प्रकल्पाधिकारी शिवाजीराव पवार व सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप आणि सचिन साळुंखे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणामधील माहिती व ज्ञान आत्मसात करुन प्रशासकीय कामकाजामध्ये अद्ययावत राहणे अत्यंत गरजेचे आहे.
- स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन)