प्रमुख रस्त्यावरील व्यापारी,दुकानदार,भाजी विक्रेते यांची कुचंबणा थांबवा
पालिकेस दिले २० दिवसाचे अल्टिमेटम
पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
एकीकडे पंढरपूर शहरात येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढत असतानाच आणि शहरातील अगदी गल्लीबोळातून आता व्यवसाय,दुकाने थाटली जात असतानाच शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची संख्या मात्र वरचेवर कमी होत गेली.पूर्वी शहरातील अनेक प्रमुख रस्ते,गल्ली बोळात असणाऱ्या मुताऱ्या हळू हळू कदाचित राजकीय वशिल्याने,दबावापोटी अथवा नगर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाडल्या गेल्या.त्यामुळे विविध रस्त्यावरील दुकानदार,भाजी विक्रेते,छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक,शहरात येणारे भाविक यांची मोठी कुचंबणा होताना दिसून येते.विविध पक्ष,संघटनांनी वेळोवेळी या बाबत नगर पालिकेकडे तक्रार करून देखील त्याची दखल घेतली गेली नाही.
नगर पालिकेने तात्काळ सदर बाब गंभीरतेने घेऊन पूर्वी असितत्वात असलेल्या ठिकाणच्या पाडलेल्या व काही नव्याने मुताऱ्या बांधाव्यात अशी मागणी पंढरपुर शहर युवक कॉग्रेसचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या वतीने नगर पालिका प्रशासनास निवेदन देत करण्यात आली.
यावेळी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार,शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी,गणेश माने,देवानंद इरकल,मा.नगरसेवक सतीश शिंदे,महेश अधटराव,रवी अग्रवाल,समाधान पोळ,शकील रत्नपारखी,सोमनाथ आरे आदी उपस्थित होते.