पुणे प्रतिनिधी
अजित पवार यांनी काही गौप्यस्फोट केलेत त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळल्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले गौप्यस्फोट, राज्यातील पाणी टंचाई आणि अतिवृष्टी याबाबत भाष्य केलं.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं. अजित पवारांनी लोकसभेच्या चार जागा लढवण्याची घोषणा केली. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं. ते पुण्यात बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे सुद्धा उपस्थित होते.
अजित पवारांची भूमिका आमच्याशी सुसंगत नव्हती
पक्षाचा अध्यक्ष मीच होतो, माझी भूमिका स्पष्ट होती, भाजप बरोबर जायचं नव्हतं. भाजपसोबत जाण्याची भूमिका आमची नव्हती. अजित पवारांची भूमिका आमच्याशी सुसंगत नव्हती. मी राजीनामा देण्याचं कारण काय होतं? मी पक्षाचा अध्यक्ष होतो. माझ्या राजीनाम्याचा निर्णय सामूहिक झाला होता. भाजपसोबत जायचं नाही ही आमची भूमिका होती. ज्यांना जायचं होतं ते त्यांच्यासोबत गेले. मी त्यांना कधीच बोलावलं नाही, असं शरद पवार म्हणाले.
अनिल देशमुख काय म्हणाले ?
ज्यांनी मला फसवलं (भाजप) त्यांच्यासोबत मला जायचं नव्हतं. आमच्यासोबत चला म्हणून माझ्या घरी हसन मुश्रीफ पाच तास बसून होते. मला पाहिजे ते मंत्रीपद द्यायला सुद्धा तयार होते, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.
राज्यातील परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगणार
राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये दौरे झाले. त्यांच्या पाहण्यांमध्ये दोन गोष्टी दिसल्या. दुष्काळी परिस्थिती आहे, पाणी टंचाई आहे. काही भागात अतिवृष्टी झाली आहे.मोठं नुकसान झाले. येत्या अधिवेशनात ही भूमिका मांडली जाईल. त्याआधी मुख्यमंत्री यांनी वेळ दिला तर आम्ही जाऊन भेटणार. हे सगळे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहोत
अजित पवार काय म्हणाले होते ?
सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला होता.शरद पवार यांनीच सत्तेत सहभागी व्हावं असं सांगितलं होतं. शरद पवार यांची सातत्याने धरसोडवृत्ती सुरू होती, त्यामुळेच आम्हाला निर्णय घ्यावा लागला असं अजित पवार म्हणाले होते.