सोलापूर प्रतिनिधी
होटगी रोड विमानतळावरून विमान उड्डाण केव्हा होणार याची तारीख सांगा ?नुसत्या बैठका व खोटी आश्वासने बंद करा, असा आक्रमक पवित्रा सोलापूर विचार मंच तर्फे घेण्यात आला आहे.सोलापूर विचार मंचच्या तीन वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर १५ जून रोजी होटगी रोड विमानतळातील प्रमुख अडथळा असलेली सिद्धेश्वर साखर कारखान्याची बेकायदा को जनरेशन चिमणी पाडण्यात आली. त्यानंतर सर्व संबंधित विभागाने तात्काळ विमान सेवा सुरू करणे अपेक्षित असताना व त्याचा वारंवार पाठपुरावा करून सुद्धा या अत्यंत गहन प्रश्नाकडे सर्वांनी दुर्लक्ष केलेले आहे. विविध कामांचे टेंडर काढणे,नुसत्या बैठका आणि फोल आश्वासने यातच प्रशासन व सर्व संबंधित खात्याने वेळ काढूपणा केलेला आहे. सोलापूरचे खासदार श्री जय सिद्धेश्वर महास्वामी यांना खोटी आश्वासने देण्याशिवाय काहीच आलेले नाही व त्यांचे केंद्रामध्ये वजन नाही.
गेल्याच आठवड्यात विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी कोल्हापूरच्या विमानतळाच्या कामाच्या बाबतीत पाहणी करून डिसेंबर पर्यंत ती कामे पूर्ण होतील असे आश्वासन तेथील खासदार महाडिक यांच्या समक्ष दिले परंतु शेजारीलच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या सोलापूरच्या विमानतळास त्यांना भेट देता आली नाही. सोलापूरच्या विमानतळाच्या २.१ किलोमीटर धावपट्टीचे रीकारपेटिंग करण्यासाठी मक्तेदारास सहा महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे परंतु सोलापूर ते विजापूर या २५.५४ किलोमीटरच्या महामार्ग चे काम रेकॉर्ड ब्रेक १८ तासात येथेच केले गेले आहे. मँचेस्टर ऑफ दी इस्ट व भारताचे दळणवळणाचे जनक , पहिला विमान बांधणी कारखाना उभारणाऱ्या सेठ वालचंद दोशी यांच्या जन्म गावात अजूनही विमान सेवा उपलब्ध होऊ शकत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. गोंदिया सारख्या १ लाख ८० हजार लोकवस्ती असलेल्या छोट्या गावातून गेल्या आठवड्यात बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली परंतु सोलापुरातील कोणत्याही लोकप्रतिनिधी व प्रशासनास सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याबाबत स्वारस्य दिसत नाही.
त्यामुळे आता तरी अत्यंत महत्त्वाची कामे लवकर करून जानेवारी २०२४ मध्ये सोलापुरातून पहिल्या विमानाचे उड्डाण व्हावे अशी मागणी सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके यांनी आज प्रधानमंत्री कार्यालय, डीजीसीए ,भारतीय विमानतळ प्राधिकरण ,आरसीएस उडान व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना तातडीचे मेल पाठवून केली आहे.