माळशिरस तालुका प्रतिनिधि जयराम घाडगे
जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षा प्रा.मीनाक्षी जगदाळे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून साखळी उपोषणास सुरुवात झाली
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना ओबीसीतून व 50 टक्के च्या आत आरक्षण मिळाले पाहिजे व यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना समर्थ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर साखळी उपोषण चालू आहे.
याचाच एक भाग म्हणून माळशिरस तालुक्यातून वेळापूर या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे .आज साखळी उपोषणाचा नववा दिवस होता. आजच्या दिवशी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षा प्रा. मीनाक्षी जगदाळे यांनी त्यांच्या सहकारी सदस्या यांच्या समवेत वेळापूर येथे उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. जगदाळे मनोगतात म्हणाल्या की आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत असून हे आरक्षण ओबीसीतून व 50 टक्के च्या आतच दिले पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनीही अशीच मागणी केलेली आहे याचा यावेळी त्यांनी संदर्भ दिला. मराठा समाजाच्या हुशार व होतकरू विद्यार्थ्यांवर व गरजूंवर आरक्षण नसल्यामुळे अन्याय होत असल्याची तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महिला भगिनींच्या माध्यमातून असेच आणखीन तीव्र आंदोलन केले जाईल असाही त्यांनी सरकारला इशारा दिला. जर सरकारने आरक्षणासंबंधी योग्य पावले वेळेत उचलले नाहीत तर जरांगे पाटलांच्या आदेशानुसार यानंतर मुंबईमध्ये हजारो लाखो मराठा महिलांना सोबत घेऊन मराठा आरक्षणाविषयी तीव्र आंदोलन केले जाईल अशी भावना व्यक्त केली. त्याचबरोबर भविष्यात जिजाऊ ब्रिगेडचे योग्य संघटन करून मराठा समाजास होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व समाजाच्या हितासाठी सर्व महिला भगिनींना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या शारदा चव्हाण. सुवर्णा शेंडगे व वेळापूर येथील महिला भगिनी, मराठा समाजाचे धनाजी साखळकर, निनाद पाटील, बबनराव शेंडगे, अनिल कदम, संदीप कदम, पार्थ जगदाळे, सागर वरकड ,रंणजीत कदम ,डॉ. पनासे यांच्यासह अनेक मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाच्या बंधू भगिनी यांनी आरक्षणा विषयीच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून काढला.