पंढरपूर प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी येथे 19 जुलै 2023 रोजी रात्री उशीरा भूस्खलनाची घटना घडली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जुलैपासून वाडीत बचावकार्य सुरु झालं होतं.सलग चार दिवस हे बचावकार्य सुरु होतं. दुर्घटनेनंतर येथील दुर्गम भौगोलिक स्थिती अंधार आणि निसरडा रस्ता यांच्यामुळे बचावकार्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे आले. पण तरीही बचावकार्य वेगाने सुरू होतं. या दुर्घटनेत अनेक रहिवाशांचा मृत्यू झाला. तर पोलिसांच्या आणि बचाव पथकांच्या अथक प्रत्नांमुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले.
यादरम्यान, खालापूर विभागाचे उप-विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांची कार्यकुशलता दिसून आली. मदतकार्य आणि बचावकार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यकुशल व्यवस्थापनामुळे अनेकांचा जीव वाचला. त्यांनी इर्शाळवाडी येथील नैसर्गिक आपत्ती दरम्यान केलेल्या प्रशंसनीय कामगिरीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून प्रशंसापत्राद्वारे त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. विशेष म्हणजे विक्रम कदम हे दुर्घटनेच्या काही दिवसांपूर्वीच पंढरपूर येथून खालापूर येथे बदली होऊन आले होते. त्यांनी कुशलतेने सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशंसापत्रात लिहिले आहे की, श्री. विक्रम कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी खालापूर विभाग, जिल्हा रायगड.. “जय महाराष्ट्र…! प्रथमत: तुम्हा सर्वांच्या इच्छाशक्तीला सलाम ! कोणत्याही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये बचावकार्यासाठी धैर्य आवश्यक असते तर पुनर्निर्माणासाठी इच्छाशक्ती, प्रशासनातील गतिमानता अधिकारी वर्गाच्या कार्यकुशलतेवर अधिक अवलंबून असते. ईर्शाळवाडीतील नुकतीच झालेली दुर्घटना मन हेलावून टाकणारी होती. परंतु आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणं हे शासन-प्रशासनाचं आद्यकर्तव्य असतं म्हणूनच आपण आणि इतर अधिकाऱ्यांनी या बचावकार्यात मोलाचे योगदान देत अवघ्या 72 तासात प्रयत्नांची पराकाष्ठा करत अनेक जीवांना जीवदान दिले. एवढ्यावरच न थांबता शासनाच्या माध्यमातून ईर्शाळवाडीचे पुनर्निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले याचेच फलित म्हणून ही वाडी पुन्हा नव्या धीराने उभी राहिली. पुढील एक वर्षभराच्या आतमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून येथील नागरिकांना पक्की घरे देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तुम्हा सर्व अधिकाऱ्यांच्या जिद्दीचा, साहसाचा आणि इच्छाशक्तीचा महाराष्ट्र शासनाला निश्चितच अभिमान आहे.”
दरम्यान, विक्रम कदम यांनी यापूर्वी पंढरपूर, नागपूर ग्रामीण काटोल, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे सेवा बजावली आहे. पंढरपूर येथे कर्तव्यास असताना कदम यांनी आषाढी, कार्तिकी वारीचे उत्कृष्ट नियोजन केले होते. विक्रम कदम यांची कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळख आहे.