पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा व धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारने मध्यस्थी करून सदर आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना केली.
माढा लोकसभा कोर कमिटीची बैठक दूरदृष्टी प्रणाली द्वारे आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये प्रशांतराव परिचारक यांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी याबैठकीस उपस्थित असलेले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.जयकुमार गोरे, आ.राम सातपुते, आदी मान्यवर यांनी आरक्षण प्रश्नावर दुजोरा दिला.
यावेळी परिचारक यांनी, गेली अनेक दिवसापासून मराठा समाज बांधव व धनगर समाज बांधव हे आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी निवेदन, साखळी उपोषण, मोर्चा या माध्यमातून आरक्षणाचा लढा शांततेपुर्ण मार्गाने लढत आहेत.
तसेच धनगर समाजाचे आरक्षण केवळ धनगर व धनगड या तांत्रिक कारणामुळे प्रलंबित आहे. धनगर समाज देखील अनेक वर्षापासून सदर आरक्षणासाठी विविध आंदोलने करत आहे.
मराठा व धनगर समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता तसेच दोन्ही समाजाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती पाहता सदर आरक्षण मिळणे गरजेचे आहे यासाठी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या कामामध्ये त्यांना मर्यादा येत आहेत असे दिसते.
यामुळे मराठा आरक्षण व धनगर आरक्षणाचा प्रश्न राज्यात खुपच चिगळलेला आहे. तरी केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. त्यामुळे मा.अजयकुमार मिश्रा यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शहा व राष्ट्रीय अध्यक्ष जगदप्रकाश नड्डाजी यांच्यांशी चर्चा करून या दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण मिळवून देण्याबाबतची आग्रही मागणी प्रशांतराव परिचारक यांनी केली.