कोल्हापूर प्रतिनिधी पूनम पाटगावे
इचलकरंजी येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजी,आणि IQAC या विभागांच्या वतीने एक दिवसीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. 21 व्या शतकातील मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्यातील सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ या मुख्य विषयाच्या अनुषंगाने हे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन मा. डाॅ. आर. आर. कुंभार , प्राचार्य, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या हस्ते झाले. सध्या समाजात दलित आणि सवर्ण यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे. परंतु भाषेचा, साहित्याचा अभ्यास करताना समाजाचा विचार होणे गरजेचे आहे,असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. बीजभाषक म्हणून प्रो.(डॉ.)सोमनाथ कोमरपंत ( माजी मराठी विभाग प्रमुख, गोवा विद्यापीठ, गोवा ) हे उपस्थित होते, त्यांनी आपल्या बीजभाषणात आजच्या सामाजिक जाणिवा साहित्यात उमटलेल्या आहेत, पण २१ व्या शतकातही सामाजिक प्रश्न सुटलेले नाहीत.भाषाभेद, प्रांतभेद याने समाजमन ग्रासले आहे, त्यामुळे साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे ,असे ते म्हणाले. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात डॉ. श्रुती जोशी (इंग्रजी विभाग, विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर) यांनी २००१ नंतरच्या महत्वाच्या इंग्रजी साहित्याचा आढावा घेऊन आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिकतेचे प्रतिबिंब साहित्यात उमटले आहे ते अनेक छोटी मोठी उदाहरणे देऊन सांगितले. तर दुसऱ्या सत्रात मा. डॉ गिरीश काशीद यांनी हिंदी साहित्यातील प्रदेशानुसार बदलेले सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट केले.
या बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. त्रिशला कदम यांनी जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या प्रवाहात अर्थकारणात जसे बदल झाले तसे साहित्यामध्येही ते झाले. त्यामुळे २१ व्या शतकातील मराठी साहित्यात उमटलेले सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ यांचा अभ्यास करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केल्याचे सांगितले. या चर्चासत्रासाठी 150 शोधनिबंध आले आहेत. त्यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, गोवा त्याचबरोबर महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, मुंबई, पुणे या जिल्ह्यांमधूनही अनेक दर्जेदार शोधनिबंध प्राप्त झाले होते. या सर्व शोधनिबंधाचे आयुशी पब्लिकेशनने रिसर्च जर्नल प्रकाशित केले आहे. या चर्चासत्रात अनेक संशोधकांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले. काही संशोधक प्राध्यापक बंधू भगिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी उद्घाटन सत्राचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक प्रो. डॉ सुभाष जाधव यांनी केले.
या बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप समारंभ डॉ.पूर्णानंद च्यारी (गोवा,कानकोन) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सुत्रसंचालन रामेश्वरी कुदळे, श्री संदिप पाटील आणि डॉ अंजली उबाळे यांनी केले. समारोपाच्या सत्राचे आभार IQAC समन्वयक प्रा. सुधाकर इंडी यांनी मानले.
हे राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, शिवाजी विद्यापीठ इंग्रजी शिक्षक संघ, शिवाजी विद्यापीठ हिंदी शिक्षक संघ, रोटरी क्लब ऑफ अतिग्रे, इनरव्हिल क्लब ऑफ इचलकरंजी, बँक ऑफ महाराष्ट्र (इचलकरंजी शाखा) आणि मैत्री फाउंडेशन, इचलकरंजी यांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष जाधव, हिंदी विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल नाईक, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. दिपक सरनोबत, मराठी हिंदी आणि इंग्रजी विभागातील सर्व प्राध्यापक, महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.