जालना प्रतिनिधी
आज मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून फळांचा रस पिऊन १७ व्या दिवशी उपोषण सोडले.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारला काही दिवसांचा अवधी देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, राजेश टोपे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर हे सर्वजण अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फळांचा रस पिऊन आपल्या उपोषणाची सांगता केली.
यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आज राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या उपोषणस्थळी आले आहेत. मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात, ही माझी भावना आहे. ते आज इथे आलेत म्हणून मी ही गोष्ट म्हणत नाही. पण ते आरक्षण देतील, हा माझा विश्वास आहे. शासनाची मागणी होती की, आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या. आपण त्या पद्धतीने एक महिन्याचा वेळ दिला आहे. ३१ व्या दिवशी सरकार आपल्या मराठ्यांना कुणबी दाखले देईल, असा विश्वास आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
त्यावेळी मुख्यमंत्री आणि जरांगे-पाटील यांच्यात काही काळ चर्चा झाली त्यानंतर त्यांनी उपोषण सोडले.

यावेळी उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे हे आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत, हे त्यांनी आज समोर येऊन सिद्ध केले. मी भारावून न जाता आरक्षणाच्या प्रश्नासाठी शिंदे यांच्या मागेच लागणार आहे. आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.राज्याचे मुख्यमंत्री शिंदे हे माझ्या उपोषण स्थळी येणार म्हटले आणि मी ही त्यांना आणून दाखवले. मी आरक्षणाबाबत मागे हटणार नाही मुख्यमंत्री शिंदे यांना ही हटू देणार नाही.