पुणे प्रतिनिधी संजय गायकवाड
जालन्यातील शांततेने सुरू असलेले आंदोलन अचानक कसे पेटले? असा सवाल आता विचारला जात आहे. मराठा आरक्षण मिळणार नाही असे म्हणणारे नेते राजकारण करत असून इंडिया आघाडीची बैठक यशस्वी झाली नसल्यानेच त्याकडे लक्ष जाऊ नये यासाठीच हे आंदोलन पेटवले जात असल्याचा आरोप आता समाजमाध्यामातून केला जातो आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. इंडिया बैठकीच्या अपयशामुळे असे प्रकार सुरू केल्याचा थेट आरोप विरोधकांवर होत आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची मागणी करत २९ ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन इतके दिवस शांततेत सुरू होते. इतकेच नाही तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांशी चर्चा केली होती आणि उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. पण अचानक असे काय झाले की या आंदोलनाला हिंसक वळण लागले असा सवाल आता सोशल मीडिया वरून विचारला जात आहे “झालेल्या सर्व प्रकाराची तर सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी यात 45 पोलिस बांधवही मोठ्या प्रमाणात जखमी झालेत. 17 तर त्यात महिला आहेत.” असे ट्विट करत अनेकांनी नेमका हा प्रकार सुरू कोणी केला असा प्रश्न विचारला आहे.
इतकेच नाही तर काल इंडिया आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. यात लोगो बाबत एकमत झाले नाही. याबरोबरच अनेक नेते बैठक संपण्याच्या आधीच निघून गेले. शक्य असेल तिथे एकत्र लढू असे म्हणणे म्हणजे एकमत नसल्याचेच चिन्ह आहे हे स्पष्ट झाले. इतकेच नाही तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टिळक भवन इथल्या भाषणात आपला पक्ष फुटलेला नाहीये ना? असा सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच टोला लगावला. हे अपयश झाकण्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन सुरू असलेले आंदोलन पेटवले गेले असा आरोप केला जात आहे.
“दोन दिवस आधी इंडिया आघाडीची बैठक झाली त्यानंतर जालन्यात मराठा क्रांती मोर्चा जो शांततेत पार पडत होता. त्यात अचानक विघ्न कसे आले या घटनांचा महाराष्ट्रातील जनतेने गांभीर्याने विचार करायला हवं. विरोधक सत्तेसाठी कुठल्याही प्रकारच्या घटना घडवू शकतात ”,असे थेट आरोप सोशल मीडिया वर केले जात आहेत.
दरम्यान या घटनेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ,“जालन्यातील घटना ही खरोखर दुर्दैवी आहे आणि गंभीर पण आहे. पण त्या उपोषणकर्त्यांशी स्वतः मुख्यमंत्री बोलले होते.उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आरक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पण हा न्यायालयाशी निगडित विषय आहे. त्यानंतर उपोषणकर्त्यांपैकी एकाची तब्येत बिघडली. त्यामुळे प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे ते दाखल झाले तेव्हा उद्या या म्हणून सांगण्यात आले. पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रशासनाचे प्रतिनिधी गेल्यानंतर तिथे दगडफेक झाली. पण काही लोकांनी याबाबत तातडीने प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. त्यांना मी सांगू इच्छितो की याबाबत राजकारण करू नये”.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की “जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी.”