अभिनेते अमोल पालेकर असणार उदघाटक
पंढरपूर प्रतिनिधी
सन २०२३-२४ हे साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) जयंतीचे वर्ष आहे. या निमित्ताने साने गुरुजींचा ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हा विचार राज्य तसेच देशभरात नव्या रुपात पोहोचविण्यासाठी ‘साने गुरुजी १२५’ हे अभियान चालविण्याचा निर्णय साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने व विविध संस्था-संघटनानी घेतला आहे. सध्याच्या सामाजिक- राजकीय स्थितीत हा समतेचा विचार अधिक प्रभावीपणे रुजणे गरजेचे आहे, या जाणीवेतून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या अभियानाचा उदघाटन सोहळा शनिवार, दि. १० जून २०२३ रोजी पंढरपूर येथील स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आला आहे. जेष्ठ अभिनेते, रंगकर्मी अमोल पालेकर यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन होणार असून प्रा.सुभाष वारे, डॉ.संजय मंगला गोपाळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर महाराज, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. चालू वर्ष हे स्वेरीचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने या सोहळ्याच्या आयोजनात स्वेरीचा सक्रिय सहभाग आहे. साने गुरुजी हे महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीतील अग्रगण्य असे व्यक्तिमत्व आहेत. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळत असताना देशातील सामाजिक स्वातंत्र्याचे काय? असा प्रश्न विचारत साने गुरुजींनी पंढरपूर येथील श्री. विठ्ठल मंदिरात दलित समाजाला प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषण केले. त्या आधी महाराष्ट्रात सर्वत्र फिरून तेथील मंदिरे दलितांसाठी खुली करून घेतली. शेवटी श्री.विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळाला आणि साने गुरुजी यांचे उपोषण समाप्त झाले. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर ‘साने गुरुजी १२५’ या अभियानाचे उदघाटन पंढरपूर येथे घेण्याचे आयोजकांनी ठरविले. आज समाजात विविध जाती-धर्म-पंथ या सर्वांमध्ये कमालीचे द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक एकमेकांकडे संशयाने पाहू लागले आहेत आणि त्यामुळे भारतीय समाजात दुफळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सामाजिक, सांस्कृतिक ऐक्याचा जागर करणे आवश्यक आहे. माणसा-माणसांत प्रेमाचे, सौहार्दाचे नाते निर्माण होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) जयंतीच्या निमित्ताने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
माणगाव (जि. रायगड) येथे असलेल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाने या अभियानाच्या आयोजनात पुढाकार घेतला आहे. पंढरपूर मधील ‘स्वेरी’ सह महाराष्ट्रातील राष्ट्रसेवा दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, नर्मदा नवनिर्माण अभियान, समता विचार प्रचारक संस्था ठाणे, श्रमिक सहयोग चिपळूण, केशव गोरे स्मारक ट्रस्ट मुंबई, चंदूभाई मेहता ट्रस्ट मुंबई, जन सहयोग ट्रस्ट, श्रमिक महिला विकास संघ, एस.एम.जोशी सोशालिस्ट फौंडेशन पुणे, कायद्याने वागा लोक चळवळ इ.महाराष्ट्रातील २५ संस्था- संघटना आतापर्यंत या अभियानात सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्राबाहेरील राज्यातून सुद्धा हे अभियान चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानात साने गुरुजींच्या विचारांवर आधारित अशी ऑनलाईन भाषण मालिका चालविणे, गुरुजींच्या कथा, कविता, लेख यांचे प्रदर्शन मांडणे, शाळा-शाळांतून वाचन प्रेरणा अभियान चालविणे, प्रसिद्ध कलाकारांचे अभिवाचन कार्यक्रम आयोजित करणे, डिजिटल व प्रत्यक्ष स्वरुपात ‘गुरुजींना पुन्हा भेटूया’ या संकल्पनेवर आधारित कथा-कथन, कविता वाचन, नाट्य, मुलाखती, व्याख्याने आयोजित करणे इ. विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सध्याचा काळ सृजनशीलतेचा, अभिव्यक्तीचा आहे हे लक्षात घेऊन त्याचा उपयोग या अभियानात करण्यात येणार आहे. युवांचा सर्व स्तरांतील सहभाग हे या अभियानाचे वैशिष्ट्य आहे. दि.१० जून रोजी सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या या उदघाटन सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे ५०० कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
तरी या पत्रकास योग्य ती प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
आपले नम्र-
डॉ. संजय मंगला गोपाळ,
श्री. दादासाहेब रोंगे (मोबाईल.८००७५५३००० )
अध्यक्ष, स्वेरी,
राजन इंदुलकर,
सरचिटणीस, अॅड विजय दिवाणे,
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट अभियान समन्वयक.