नवी मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
नेरूळ येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विद्यमाने संघाच्या ज्येष्ठ नागरिक भवनच्या सभागृहामध्ये महाराष्ट्रदिन व कामगार दिन युवक, ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेचे ज्येष्ठ मान्यवर पांडुरंग क्षेत्रमाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सुरू झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी कुमारी नीलम तरकसबंद तसेच छोटी उल्का यांनी समयोचीत उस्फूर्त भाषण करून महाराष्ट्र दिनाचा समग्र इतिहासच श्रोत्यांच्या समोर मांडला. संस्थेचे सहसचिव अजय माढेकरांनी १०५ हुतात्म्यांची नावे वाचून दाखवली आणि त्यांना कृतज्ञता म्हणून दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी संघाचे खजिनदार विकास साठे यांनी सांगितले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले, त्याचा निषेध म्हणून सी. डी. देशमुख यांनी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला .
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं. आपण आता आपल मराठीपण जपले पाहिजे, मराठी भाषा टिकवली पाहिजे. तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी सांगितले की, सन १९६२ मध्ये चीनने भारतावर हल्ला केला त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीमध्ये बोलावलं आणि संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी दिली.
त्यावेळी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असे मथळे वृत्तपत्रात छापून आले होते. महाराष्ट्राचा अमृत कलश श्री यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीहून आणला आणि एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तसेच यासाठी प्रबोधनकार ठाकरे , प्र के अत्रे, कॉम्रेड अहिल्या रांगणेकर, एस एम जोशी, सेनापती बापट अशा अनेक नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी केली असे सांगितले. ज्येष्ठ मान्यवर पांडुरंग क्षेत्रमाडे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
श्रीमती मेघा ब्रह्मनकर यांनी वीरश्रीयुक्त गीत गायले. रमेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्यगीत तसेच इतर गीते गाऊन लोकांचे मनोरंजन केले. यानंतर संस्थेचे सचिव दीपक दिघे यांनी सर्व उपस्थित श्रोत्यांचे व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते यांनी अत्यंत सुसूत्रपणे केले .