पंढरपूर प्रतिनिधी
वेळापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे कवी समाधान देशमुख यांच्या ‘चांगभलं’ या काव्यसंग्रहाचा व ‘जागर’ या चारोळीसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दि.14 मे 2023 रोजी पंढरपूर येथे सुप्रसिद्ध लेखक, वक्ते डॉ. यशवंत पाटणे यांच्या हस्ते व डॉ. राजेंद्र दास यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी मंचावर मा.न्यायाधीश शशिकांत महागार, पोलीस निरीक्षक माणिक बेद्रे, नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना बेद्रे, शिवप्रज्ञा प्रकाशनाचे राजेंद्र भोसले, संगीतकार बाळासाहेब माने, समाधान देशमुख यांच्या मातोश्री तारामती देशमुख व पत्नी वंदना देशमुख हे उपस्थित होते.
पुस्तकांच्या प्रकाशनानंतर कवी समाधान देशमुख यांनी उपस्थिताचे स्वागत करत आपल्या काव्यप्रवासाची माहिती दिली. या वेळी बोलताना डॉ. राजेंद्र दास म्हणाले कि,कवी हा प्रेमळ व संवेदनशील असलाच पाहिजे पण त्याचबरोबर समाजातील चुकीच्या गोष्टींवर आसूड ओढणे ही सुद्धा कवीची जबाबदारी आहे. जो न देखे रवी तो देखे कवी असे म्हटले जाते त्याप्रमाणे कवीच्या सुक्ष्म दृष्टीला समाजातील विपरीत परिस्थिती अस्वस्थ करत असते.
या वेळी बोलताना डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, कवी समाधान देशमुख माणसांचं चांगभलं आणि शब्दांचा जागर करणारा कवी आहे. चिरंतन शब्दफुलांचा बहर फुलवणारी त्यांची कविता आहे. त्यांची कविता आनंदाचं गाणं गाणारी आहे. ते आशावादी वृत्तीचे व मांगल्याचे उपासक आहेत. पोलीस खात्यातील त्यांचे जीवन धावपळीचे व तणावपूर्ण असतानासुद्धा ते शब्दसुरात हरवलेले प्रतिभासंपन्न कवी आहेत. आजच्या संभ्रमित काळात समाधान देशमुख हे एका हाती काठी आणि दुसर्या हाती लेखणी घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा व आशावादाचा सुर आळवतात. सुंदरता व चैतन्य यांनी बहरलेली त्यांची कविता जागल्याची भूमिका घेते.
नेटके नियोजन आणि शिस्तबद्धपणे संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी कल्याण शिंदे, प्रकाश गव्हाणे,अंकुश गाजरे,सचीन कुलकर्णी यांचेसह अकलूजचा मार्नीग ग्रुप,बार्शी,श्रीपूर,पंढरपूर, मोहोळ,कुरुल, सोलापूर, व इतर ठिकाणाहून आलेले साहित्यरसिक व मित्र परिवार, आप्तेष्ट बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
पुणे येथील संगीतकार बाळासाहेब माने यांच्या स्वागत गीताने सुरु झालेल्या या सुंदर प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक बार्शीचे प्रा. रामचंद्र इकारे यांनी केले तर अकलूजचे डॉ.श्री प्रेमनाथ रामदासी यांचेसह प्रशांत वाघमारे यांनी सुत्रसंचालन केले. सन्माननीय पाहुणे व उपस्थिताचे पंढरपूरचे रवी सोनार यांनी आभार मानल्यानंतर प्रा. गेळे यांनी गायलेल्या सुष्राव्य पसायदानानंतर सोहळ्याची सांगता झाली.