शरद पवारांनी कर्जत विधानसभा मतदारसंघातून जनतेवर लादलेल्या रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वीच सोलापूर लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार? असे वक्तव्य करून कदाचित ते पहिल्यांदाच आमदार झाल्यामुळे अजून त्यांच्यात पोरकटपणा असेल अशी खोचक टीका केली होती. त्याच पध्दतीने मोहिते पाटलांना सोबत घेतल्याशिवाय आपल्या आजोबांचे पानही हलत नव्हते अशा अकलूजकरांची चमक, धमक पूर्वीप्रमाणे राहिली नाही असे बालिश वक्तव्य करणारे कोण रोहित पवार? असे आम्ही म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
पुणे जिल्ह्यातील पवार कुटुंबियांनी एक एक जिल्हा काबिज करण्यासाठी नगर जिल्ह्याकडे लक्ष दिले. म्हणूनच कर्जत जामखेड भागाकडे त्यांनी रोहित पवारांना पाठविले. यादरम्यान बरेचसे कारखाने त्यांनी गिळंकृत केले. त्यानंतर आता यांची स्वारी सोलापूर जिल्ह्याकडे वळली. सोलापूर भागामध्ये एकदा शरद पवार व एकदा विजयसिंह मोहिते पाटील बहुमतांनी आले. त्यामुळे रोहित पवारच्या रूपाने आपला हुकमी एक्का तिथे असावा म्हणून माढा मतदारसंघात रोहित पवारला खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे त्यांच्या बैठकीत ठरले आहे. परंतु माढा म्हणजे कर्जत जामखेड नाही, माढा मतदारसंघातून रोहित पवारांचा पार्थ अजित पवार झाल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरच्या अभिजीत पाटलांच्या कार्यक्रमात पंढरपूरचे नेतृत्व परिचारकांवर तोफ डागण्याऐवजी रोहित पवार मोहिते पाटलांवर तोफ डागतात, याचा अर्थ परिचारक हे पवार कुटुंबियांच्या दृष्टीने नगण्य आहेत असाच होतो. त्यामुळेच त्यांनी अकलूजकरांवरती तोफ डागली. यावरून बारामतीकरांचीच चमक, धमक राहिलेली नाही हे दिसून येते. आम्ही रोहित पवारांना भविष्यातील शरद पवार समजत होतो. परंतु शरद पवारांनी सुध्दा अकलूजकरांवर कधी तोफ डागली नाही. अकलूज ग्रामपंचायत ही आशिया खंडातील एक नंबरची ग्रामपंचायत होती हा रोहित पवारांना इतिहास माहिती नाही का? सोलापूर जिल्ह्यातील दूध संकलनापैकी ५० टक्के दूध संकलन एकट्या माळशिरस तालुक्यातून होते हे रोहित पवारांना माहिती आहे का? सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष अकलूजकरांनी ठरविल्यानंतर होतो हे रोहित पवारांना माहिती आहे का? प्रणिती शिंदे ज्या बोलतात तसेच अकलूजमधील सामान्य माणूस सुध्दा बोलतोय की, कोण रोहित पवार? ज्यांची घरे काचेची असतात, ते दुसऱ्यांवर दगड फेकत नाहीत. सध्या कर्जत जामखेड भागातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती भाजपाच्या राम शिंदे यांनी जिंकल्या आहेत. अगदी ज्या भागातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत त्या भागातील जनता सुध्दा आता म्हणू लागली आहे, कोण रोहित पवार? मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पार्थ अजित पवार दोन लाख मतांनी नाकावर आपटले. पुणे जिल्ह्यातील लोक सुध्दा म्हणू लागले की, कोण हा पार्थ पवार? जेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिला आणि त्यांचा राजीनामा मागे घेण्यासाठी महाराष्ट्रातून शरद पवार या वयोवृध्द थकलेल्या माणसाच्या मागे आम्हाला साहेबच पाहिजेत म्हणून जोर लागला. तेव्हा एकही म्हणाला नाही की आम्हाला अजित पवार, रोहित पवार पाहिजेत. कारण राष्ट्रवादीमध्ये चित्र असे आहे की, कोण अजित पवार आणि कोण रोहित पवार? पवारांची छत्रछाया बाजूला सारली तर काटेवाडीच्या ग्रामपंचायतचा सदस्यही रोहित पवारांना हरवू शकतो.
मूळात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच मोहिते पाटलांमुळे झालीय हे अकलूजकरांबद्दल बरळणाऱ्या आमदार रोहित पवारांनी लक्षात घ्यावे. वसंतदादा पाटील यांच्या गटात प्रबळ असलेल्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह महिते पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यासाठी शरद पवारांनी आपल्यासोबत येण्याची गळ घातली होती. तेव्हा १३ आमदारांना सोबत घेऊन विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांबरोबर आले होते. याची जाण शरद पवारांना असेलच, पण कुठे आता राजकारणात उतरलेल्या रोहित पवारांना हे कसे कळणार? केस पांढरे झाले म्हणजे माणूस खूप हुशार असतो असा समज कुणी करून घेऊ नये. कारण ते अकाली वृध्दत्वपणाचे लक्षण असते. आपल्या टाळूवरील पांढरे केस चमकतात म्हणून तुम्ही चमकदार नाही. हा झाला विनोदाचा भाग. पण अकलूजकरांची चमक व धमक पाहून तुमच्या आजोबांचे डोळे दिपून गेलेत. २००९ साली माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्यानंतर पुन्हा एकदा २०१४ साली आपल्या आजोबांनी खासदारकीसाठी हट्ट धरला होता. पण मोदीलाट पाहून आपल्या आजोबांच्या चेहऱ्यावरील चमक व धमकही लोप पावली होती. तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरताच मोदी लाटेतही त्यांनी दिवा लावण्याचे काम केले होते. यादरम्यान तुम्ही कुठल्या तरी शाळेत शिकत असाल किंवा एग्रो कंपनीमध्ये जाऊन बसत असाल. तेव्हा तुम्हाला अकलूजकरांची चमक आणि धमक काय कळणार? मोहिते पाटील हे संयमी राजकारणी आहेत. आपल्या चुलत्याने सोलापूरातील अनेक सहकाऱ्यांना हाताशी धरून मोहिते पाटलांवर कुरघोड्यांचे राजकारण केले. यादरम्यान तुमच्या चुलत्यांचे सहकारी मित्र थकले, पण मोहिते पाटील यांची चमक आणि धमक संपली नाही. आपल्या धमकेवर विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीचे खासदार असतानाही त्यांनी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात विकासनिधी खेचून आणला. विजयसिंह मोहिते पाटील यांनी २००४ सालापासून ६ जिल्हे व ३१ तालुक्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी आपल्या आजोबांकडे वारंवार पाठपुरावा केला. पण या योजनेमुळे अकलूजकरांची चमक आणि धमक आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल म्हणून आपल्या आजोबांनी या योजनेत नेहमी अडथळेच निर्माण केले. आपल्या आजोबांना खरंच शेतकऱ्यांचा कळवळा असता तर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेत राजकारण न आणता ही योजना मार्गी लावली असती. पण अकलूजकरांची चमक व धमक वाढेल आणि आपण काळवंडून जावू याचसाठी ही योजना आपल्या आजोबांनी गुंडाळली. महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटलांची तिसरी पिढी सक्रीय असून आता चौथी पिढी सक्रीय होत आहे. त्यामुळे आता अकलूजकरांची चमक आणि धमक पूर्वीपेक्षाही वाढेल यात वादच नाही. पण तत्पूर्वी अकलूजकरांची चमक व धमक कशी आहे हे राजकारणात अजूनही लहानच असलेल्या रोहित पवारांनी आपल्या आजोबांना विचारल्यास ते त्यांना योग्यरित्या समजावून सांगतील. इतकेच!