पंढरपूर प्रतिनिधी
शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून विविध विभागामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार आहे. या अभियानातर्गंत कृषी विभागामार्फत खरीप हंगामपूर्वी शेतकऱ्यांना आपल्या शेतीकरीता विविध योजनांचा लाभ देणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी दिली.
खरीप हंगामात शेतामध्ये विविध पिकांची लागवड करण्यात येते. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हंगाम असून, खरीप हंगामातील पिकांना पूरक ठरणाऱ्या विविध योतनेतर्गंत मोहीम सुरु करण्यात येत आहे. मका आणि ऊस उत्पादन वाढीमध्ये बीज प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून जमिनीतून व बियांणाद्वारे पसरणाऱ्या रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची जोरदार वाढ होण्यासाठी बीज प्रक्रिया कमी खर्चात अत्यंत प्रभावी साधन आहे. या दृष्टीने खरीप हंगामात जास्तीत जास्त क्षेत्रावर बीज प्रक्रिया केलेल्या बियाणांची पेरणी करण्याच्या दृष्टीने बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. महाडीबीटी या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनेचा लाभ देण्यात येतो. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, अस्तरीकरण, फळबाग लागवड, कांदा चाळ अशा विविध योजनांचा लाभासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरुन घेणे.हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हुमणी नियत्रंण व प्रकाश सापळे बसविणे मोहिम राबविण्यात योणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्याची पीक पध्दती व आव्हाने लक्षात घेवून तालुक्यातील साखर कारखाने, कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या माध्यमातून प्रसार व प्रचार करण्यासाठी कृषी विभागाने आवश्यक नियोजन केले असून, तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री.सरडे यांनी केले आहे.