पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावले. अनेकांच्या छोट्या मोठ्या लढाया यासाठी महत्त्वाच्या ठरल्या. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे कार्यही असेच. त्यांच्या ऐतिहासिक जाज्वल्य कामगिरीला उजाळा देण्याचं कार्य महर्षी वाल्मिकी संघ गेल्या अनेक वर्षांपासुन करत आहे. आज आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या शहीद दिनानिमित्त महर्षी वाल्मिकी संघाने पंढरीत विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करुन अभिवादन केले.
यावेळी चंद्रभागेच्या पात्रातील त्यांना अटक केलेल्या ठिकाणी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे स्मारक, राघोजी भांगरे चौक, पंढरपूर, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे सामान्य रुग्णालय (उपजिल्हा रुग्णालय) पंढरपूर, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायामशाळा पंढरपूर आदी ठिकाणी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, संत घाडगेनाथ महाराज फड दिंडी सोहळयाचे कृष्णत महाराज शिंदे, बापूसाहेब महाराज उखळीकर, अशोक महाराज वाणी, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. माने, भारत माने, प्रकाश अधटराव, देवेंद्र माने, सोमनाथ अभंगराव, विकी अभंगराव, विकी कोताळकर, रामभाऊ कोळी, प्रकाश मगर, सुरज ननवरे, सुरज कांबळे, सोमनाथ मगर, गणेश कोळी, अमोल तावसकर, पांडुरंग अभंगराव, शंकर आदमिले, श्रीकांत बळवदकर, गणेश कांबळे आदींसह अनेकजण उपस्थित होते.
इतिहासाने कांही क्रांतीकारकांची दखल घेतली असली तरी अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली गेली नाही. ते समाजापर्यंत पोहोचलेच नाही. आदिवासी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची दखल इतिहासाला घ्यावी लागली. परंतु अजूनही ते जनसमाजात पोहोचलेले नाहीत. त्यांचे कार्य भावी पिढीला प्रेरणादायी ठरणारे असल्याने
कार्य सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य आम्ही हाती घेतले असून ते अखंडीतपणे हे कार्य सुरु ठेवू. असे मत यावेळी गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले.
असा आहे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास
राघोजी भांगरेंचा जन्म 8 नोव्हेंबर 1805 रोजी देवगाव येथे आदिवासी महादेव कोळी जमातीतील आई रमाबाई व वडील रामजी यांच्या पोटी जन्म झाला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने नटलेले देवगाव हे छोटेसे खेडे होते. वडील रामजी ब्रिटिश सरकारच्या दरबारी सुभेदार म्हणून नोकरी करत होते. परंतु इ. स. 1818 साली ब्रिटिशांनी मराठा सैन्यास हरवल्यानंतर महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारात गणल्या जाणार्या सह्याद्रीतील किल्यांच्या शिलेदार्या, वतनदार्या काढल्या. परंपरागत अधिकार काढल्याने इंग्रजांविरुद्ध महादेव कोळ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला.
कोकणात एक दरोडा पडला होता, या दरोड्याचा आरोप राघोजीचे वडील बंडखोर असल्यामुळे त्यांच्यावर करण्यात आला. राघोजींच्या घरच्यांचा पोलिसांनी मोठा छळ केला. राजूर प्रांताचा पोलिस अधिकारी अमृतराव कुलकर्णी यांची भेट घेऊन छळ थांबविण्यासंदर्भात दोघांमध्ये बोलणे चालू असताना बाचाबाचीत अनर्थ झाला. धिप्पाड राघोजीने मुंडकं तोडून एका कोपर्यात ठेवले. धिप्पाड राघोजीला अडविण्यास कोणी धाजवले नाही. 1826 चे ते साल त्यांनी आपल्या सुखी जीवनावर तुळशीपत्र ठेवले. राघोजी भांगरे आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाने क्रांतीची मशाल अधिक तेजस्वी होऊ लागली. 1827 साली हिवाळ्या घाटाच्या दरीमध्ये प्रचंड काळोखात एक सभा घेतली. येथील सभेत देवजी आव्हाड सहाय्यक सल्लागार, तर राया ठाकर राघोजींचा अंगरक्षक बनला. मायभूमीला मुक्त करण्याची शपथ यावेळी घेतली गेली. राघोजींच्या टोळ्यांनी गोर्यांना सळो की पळो करून सोडले.
नोव्हेंबर इ. स. 1844 ते मार्च इ. स. 1846 या काळात राघोजींचे बंड शिगेला पोहोचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रजांचे वैरी आहोत’, अशी भूमिका जाहीर केली होती. कुटुंबातील समाजातील स्रियांबद्दल राघोजीला अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य, प्रामाणिकपणा व नितिमत्ता याला त्याने उच्चतम मानले. इ.स. 1845 ला जुन्नरचा उठाव ठरला. कॅप्टन मँकिंटॉशने 20 हजाराची फौज घेऊन वेढा टाकला. यावेळी मोठी हार पत्कारावी लागली. भागोजी नाईक, खंडू साबळे आदी निष्ठावंत साथीदार धारातीर्थी पडले. राघोजी तुरी देऊन निसटला. राघोजीला कोणाला शोधता येऊ नये म्हणून गोसाव्याच्या वेशात फिरू लागला. पंढरपूर येथे बंडाच्या काळात तेथील आदिवासींना पुन्हा जमा करून बंड करण्याच्या तयारीत असणार्या राघोजीला इंग्रजांनी पकडले व ठाण्यास नेले. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला. इंग्रज अधिकार्यांनी त्यांना वकील मिळू दिला नाही. त्याने कोर्टात स्वतः च बाजू मांडली. 2 मे 1848 रोजी ठाणे सेंंट्रल जेल येथे राघोजी भांगरेंना फाशी देण्यात आली. परंतु राघोजींचे स्मरण करण्यासाठी 2 मे 2014 उजाडावे लागले. यादिवशी 166 व्या स्मृतीदिनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे सेंट्रल जेल व जिल्हाधिकारी कार्यालाजवळील मुख्य चौकास आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे असे नावे देण्यात आले.