मायणी प्रतिनिधी
"साहित्याच्या प्रांतात उपेक्षित राहिलेल्या लेखकांना पाठबळ देणारी आस्वादक समीक्षा प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी लिहिली आहे. त्यामुळेच साहित्यातील हा 'शब्दसरवा' लक्षणीय आहे. ग्रामीण भागातील कसदार साहित्याला बळ देणारा हा माणदेशी समीक्षेचा ठेवा आहे. ग्रामीण साहित्याच्या समीक्षेत लक्षणीय भर घालणारे हे पुस्तक ठरेल." असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. उदय जाधव यांनी केले. ते येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील वाङ्मय मंडळ व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'शब्दसरवा' पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सयाजीराव पवार होते.
प्रारंभी मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. पुस्तकाचे परीक्षण प्रा. द्रौपदा दबडे-कणसे यांनी केले. तर लेखक डॉ सयाजीराजे मोकाशी यांनीही आपली लेखनविषयक भूमिका व्यक्त केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सयाजीराव पवार म्हणाले, "आचरणातील विनयशीलता आणि अनुभवातील समृद्धी यामुळे चांगला लेखक घडतो. लेखक घडविणाऱ्या समीक्षकाचे उत्तम पुस्तक म्हणून 'शब्दसरवा' ग्रंथाचा उल्लेख होत राहील."
आभार प्रदर्शन प्रा.डॉ. विलास बोदगिरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर माळी यांनी केले. यावेळी कवयित्री कुंदा कांबळे, कादंबरीकार रंजना सानप, कवयित्री वंदना लिपारे, संजय जगताप, प्रा. गौरी कुंभार, प्रा. डॉ. शौकतअली सय्यद, प्रा. श्रीकांत कांबळे, प्रा. मनोज डोंगरदिवे, प्रा. स्वाती माळी, प्रा. डॉ.उत्तम टेंबरे, प्रा. डॉ. अक्रम मुजावर, प्रा. सूरज पडळकर आदी मान्यवर उपस्थित होते.