मायणी प्रतिनिधी
"वारकरी व लिंगायत चळवळ ही मूलतः साहित्याची चळवळ होती. जिथे जगणे कठीण असते, तिथे सकस साहित्याची निर्मिती होते, हे माणदेश आणि परिसरातील साहित्यनिर्मिती मधून दिसून येते. शब्दांचे हत्यार करून लढायला शिकले पाहिजे. क्रांती करण्यासाठी शब्द सामर्थ्यावर विश्वास असला पाहिजे. माणसाचे दुःख दूर करणे हे साहित्यिकांचे खरे कर्तव्य आहे," असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले. ते येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचा मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३व्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.
यावेळी स्वागताध्यक्ष श्री.एन.व्ही.कुबेर मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री.ए.टी. पुस्तके, प्राचार्य तानाजी चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा.विकास कांबळे, पत्रकार प्रकाश सुरमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी वृक्षाला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले, तर संमेलनाची भूमिका प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी स्पष्ट केली. संमेलनात कवी प्रकाश भोंगाळे यांच्या 'विचार मोती' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कोणतेही सरकार हे समर्थ शब्द पेरणाऱ्या साहित्यिकांना घाबरते, हे स्पष्ट करताना संमेलनाध्यक्ष डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, "धर्मवर्णजाती यांचा अभिमान नष्ट करण्यासाठी संतांचा लढा होता. धर्म पाळण्याचा अधिकार सर्वांचा आहे, परंतु भेदाभेद करण्याचा अधिकार कोणालाच नाही. समता निर्माण करण्याचे सगळ्यात मोठे काम शब्दच करतात आणि विषमता निर्माण करून दंगली पेटवायचे कामही शब्दच करतात. आपण कोणत्या शब्दांच्या बाजूने उभे राहायचे, हे ठरविले पाहिजे. आजारी मेंदूंच्या माणसांनी लिहिलेली पुस्तके आजारी असतात. अशी आजारी पुस्तके दुरुस्त करता येत नसतील तर ती नष्ट करावी लागतात. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती. विद्यार्थ्यांनी या वयातच शेतकरी, कष्टकऱ्यांच्या दुःखाचा शब्द लिहिला पाहिजे. कारण ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांचा शब्द बनून उभे राहणे हे चांगल्या साहित्याचे लक्षण आहे."
आभार प्रदर्शन वाङ्मय मंडळाचे प्रमुख प्रा. डॉ. शौकतअली सय्यद यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर माळी यांनी केले. यावेळी कवी, रसिक, प्राध्यापक व विद्यार्थी यांची मोठी उपस्थिती होती.