सांगोला प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शेकापक्षासोबत असलेले जिव्हाळ्याचे संबंध तहायत जपले.
भाई उद्धवराव पाटील - दादांनी 1954-55 साली औरंगाबादच्या भेटी दरम्यान बाबासाहेबांना पक्षाचे नेतृत्व करावे अशी विनंती केली तेव्हा व्यापामुळे बाबासाहेबांनी ते नम्रपणे नाकारले परंतु शेकापक्षाच्या पाठीशी कायम राहण्याचे वचन दिले. पुढे बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धवराव दादांनी 14 एप्रिल या दिवशी शासकीय सुट्टी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केले व ती सुट्टी मंजूर करुन घेतली.
शेतकरी कामगार पक्षाचे भाई माधवराव बागल यांनी 1950 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुलेंचा पहिला पुतळा बाबासाहेबांच्या हयातीतच उभारला तसेच नामांतराची पहिली परिषद शेकापक्षाच्या भाई बागलांच्या नेतृत्वात झाली.
खोतीच्या लढ्याचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केशवराव जेधे, शंकरराव मोरे, भाऊसाहेब राऊत आदींच्या सहकार्याने केले होते. कोर्टातील बाजू सांभाळण्याच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर या लढ्यामधे सहभाग नोंदवला होता आणि कोर्टातील तो लढा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वी केला.
अश्या अनेक लढ्यात कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सारखे शेकापक्षाचे संस्थापक असो किंवा इतर नेते, कार्यकर्ते असो डॉ बाबासाहेबा आंबेडकरांच्या बरोबर शर्थीने लढले, पक्ष स्थापनेपूर्वीही सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून ह्या सर्वांनी बाबासाहेबाबरोबर काम केले होते.
सत्यशोधक समाजाचा राजकीय विचार म्हणून पुढे आलेल्या बाबासाहेबांच्या सर्वाधिक जवळच्या पक्षात आम्ही वाढलो व वावरत आहोत ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगितल्याची माहीत प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.