जिद्द, परिश्रम, चिकाटी, कल्पकवृत्ती, दूरदृष्टी व संवेदनशील स्वभाव या गुणांचा समुच्चय म्हणजेच स्व. सौ. व श्री. पुष्पावती वसंतराव सोनार यांचे सुपुत्र रविराज होय. रविराज, आपण रवीही आहात व कवीही आहात. केवळ आपल्या नावासमोर कवी एवढेच लिहून चालत नाही तर विश्वविक्रमवीर कवी असेच लिहावे लागते. हा बहुमान मिळवण्यासाठी आपण घेतलेले कष्ट व आपल्याकडे असणारी कल्पकवृत्ती ही खरोखरच वाखाणण्याजोगीच आहे.
रविराज, आपल्या कुटुंबातील पारंपारिक व्यवसाय बाजूला ठेवत आपण महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षणाबरोबरच एका वेगळ्या वाटेने प्रवास करण्याचा निर्णय घेतला व आपल्या अर्थार्जनाला खूप लवकर सुरुवात केली. कुटुंबवत्सल स्वभाव व संवेदनशील वृत्ती यामुळे कायम आपण कुटुंबासोबत राहिला, कुटुंबातील व्यक्तींच्या मान - मर्यादा सांभाळत त्यांची मान ताठ राहील अशाच प्रकारची कामगिरी आपण करत आला.
साहित्याचा व सामाजिक कार्याचा कोणताही वारसा आपल्या पाठीशी नसताना देखील आपण साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक वेगळे वलय निर्माण केले आहे. कविता, गौळणी, हायकू, लावणी, कथा, कादंबरी, ललित गद्य व पद्य लेखन, एकांकिका, पटकथा अशा साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपण मुक्तपणे संचार केला आहे. निरीक्षणवृत्ती व समाजाबद्दल असणारी तळमळ यातून आपलं लेखन जिवंत बनत गेलं. तर आपणाकडे असणारी प्रतिभा व कल्पक वृत्ती यामुळे आपले लिखाण कसदारही बनत गेले. नव्या नव्या कल्पना लढविणे व त्या प्रत्यक्षात उतरविणे हा आपला स्वभाव आहे. साहित्याच्या क्षेत्रात देखील आपण अनेक प्रयोग केले आहेत. या साहित्यातील योगदानाबद्दल आपला अनेक वेळा सन्मानही झाला आहे व अनेक पुरस्कारही आपणास प्राप्त झाले आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदवले असल्याने विश्वविक्रमवीर कवी हा बहुमान तर खरोखरच आम्हा सर्वांसाठी भुषणावह असाच आहे.
सामाजिक क्षेत्रात देखील आपण संवेदनशील मनाने आजपर्यंत कार्यरत राहिला. समाजाची गरज ओळखून ज्यांना जे हवे आहे व आपण जे देऊ शकतो ते त्यांना देण्याचा आपण आजपर्यंत प्रयत्न केला आहे. निस्वार्थ, निरपेक्ष भावनेने प्रसिद्धीपासून दूर राहून आपण केलेल्या सामाजिक कार्यामुळे आपल्याबद्दलची समाजाच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. या साऱ्या कार्यात आपल्या सुविद्य पत्नी सौ सविता, मुले कु. रेवती आणि चि. ओंकार यांची साथ व सहकार्यही आपणाला मिळाले आहे. समाजाच्याबरोबर आपण सतत राहिले पाहिजे व आपल्याकडून समाजाला सतत काहीतरी देता आले पाहिजे या भूमिकेतून आपण अनेक प्रसंगांतून समाजाच्या मदतीचे कार्य केले आहे. आईच्या स्मरणार्थ पुरस्कार देणे असो अथवा आपल्या वहिनीच्या स्मृतिदिनानिमित्ताने साहित्यांचे वाटप करणे असो अथवा आपल्या वयाच्या पन्नाशीमध्ये सरासरी प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे एका कॅलेंडर वर्षात ५१ उपक्रम करणे असो अथवा आपल्या कन्येच्या पहिल्या पगारातून गरजूंसाठी मदत करणे असो अशा अनेक प्रसंगातून आजपर्यंत आपण समाजाची सेवाच केली आहे.
मित्र परिवारासाठी तत्परतेने मदतीला धावून जाण्याचा आपला स्वभाव, त्यामुळेच आपला मित्रपरिवारही खूप मोठा आहे. आपण आपल्या व्यवसायातून जेवढी धनसंपत्ती मिळवली, त्यापेक्षाही आपल्या स्वभावाने व कार्याने माणसे मात्र खूप कमावली आहेत. या माणसांचा आपल्यावर कायमच स्नेह आहे. आपल्या ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणाला खूप खूप शुभेच्छा!आपल्या हातून याच पद्धतीने उत्तुंग कार्य घडत राहो व हे कार्य करण्यासाठी आपणाला परमेश्वराने निरोगी दीर्घायुष्य द्यावे हीच प्रार्थना !
- डॉ.सचिन लादे, पंढरपूर