पंढरपूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील सेतू सेवा केंद्र पुर्ववत सुरु करण्यात यावीत अशी मागणी ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
जिल्ह्यात तहसील कार्यालयाच्या आवारात व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेली सेतू सेवा सुविधा केंद्र १ एप्रिल पासून बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे या केंद्रातुन नागरिकांना मिळणाऱ्या सेवा बंद झाल्या आहेत.याचा परिणाम महा ई सेवा केंद्रावर गर्दी वाढल्याने तेथे मिळणाऱ्या सेवा वेळेत मिळत नाहीत, वाजवी दरात मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
सध्या परिक्षा संपल्याने पुढील प्रवेशासाठी लागणारे,तसेच देशभर सुरू असलेल्या नोकर भरतीसाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे, राष्ट्रीयत्व, अधिवास, इ. अनेक प्रकारचे दाखले मिळण्यासाठी पालक,विद्यार्थी यांची गर्दी वाढत असतानाच सेतू सेवा केंद्र बंद करणे अन्यायकारक, नागरिकांच्या गैरसोयीचे आहे.
वास्तविक ही सेवा केंद्रे अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना उलट ती बंद केली आहेत.
नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक जलद,वेळेत मिळण्यासाठी शासनस्तरावरुन विशेष मोहीम हाती घेतली जात* आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात नागरिकांना मिळणाऱ्या सेवा कमी करण्यात येत आहेत ही बाब "जनताभिमुख प्रशासन" विरोधी आहेत.शासनाने नुकतीच "शासकीय योजनांची जत्रा" हा उपक्रम जाहीर केला आहे. या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारे विविध दाखले वेळेत मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
तरी ही सेतू सेवा केंद्र तात्काळ सुरु होण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी तसेच महा ई सेवा केंद्रात अवास्तव दर आकारणाऱ्या केंद्रावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते,जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर, संतोष उपाध्ये,पांडुरंग अल्लापूरकर यांनी या पत्रात केली आहे.