मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
भगवंताची इच्छा असते तेव्हाच आपण दर्शनाला येऊ शकतो. असं म्हटलं जातं. तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. देवावर पूर्ण श्रद्धा आहे पण आपण होऊन कधीही देवस्थानांची यात्रा न करणारा मी, सौ. सुनंदा पायगुडे यांच्या प्रेरणेने, इस्कॉन चे प्रतिनिधी कुमार गौरांग प्रभू यांच्या मायापूर यात्रेच्या समूहात सामील झालो. अर्थात याला दुसरीही एक बाजू होती ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांबद्दल असलेले अंतरिक प्रेम. एकूण १८ ज्येष्ठ भक्तांच्या या समूहात वय वर्षे सत्तरीच्या आसपासचे सदस्य सहभागी झालेले होते. गुढीपाडवा या सणाचे औचित्य साधून नूतन वर्षाच्या प्रारंभीच एक आठवड्याची कलकत्त्यापासून आयोजित केलेली ही धार्मिक यात्रा रामनवमीचा मुहूर्त साधून बाबा लिंगराज मंदिरातील अनेक देवदेवतांच्या दर्शनाने सुफल संपन्न झाली. कलकत्ता येथील इस्कॉनच्या राधा गोविंद मंदिर यांच्या दर्शनाने सुरू झालेल्या या यात्रेच्या कालावधीत उल्टा डांगा, गंगासागर, मायापुर धाम येथील सर्वच मंदिरे, जगन्नाथ पुरी, नील माधव, टोटा गोपीनाथ, हरिदास ठाकूर समाधी, सिद्ध बकुल, अलारनाथजी, सातापाडा, इस्कॉन भुवनेश्वर, साक्षी गोपाल, लिंगराज कोणार्क येथील सूर्य मंदिर आदि तीर्थक्षेत्रांतील देव देवतांचे दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं.
इस्कॉनचे कुमार गौरांग प्रभु जी यांनी गुरुबंधू व्रज माधव दास प्रभू यांच्या साथीने या धार्मिक यात्रेचे आयोजन केल्याने सहाजिकच कलकत्त्यातील उल्टा डांगा येथील, येथे पूर्वी गौडीया मठ होता. त्या धार्मिक स्थळाला प्रथम भेट दिली. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे आचार्य संन्याशी येथे बारा वर्षे वास्तव्यास होते. श्रील प्रभुपाद यांचे हे गुरु. येथेच गुरु शिष्यांची प्रथम भेट झाली व १९२२ साली इस्कॉन चे बीज पेरले गेले. भक्ताचे स्थान हे भगवंतासारखंच शक्तिशाली असतं. आध्यात्मिक दृष्ट्या प्रबळ असतं. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पुढे इस्कॉन ची झालेली स्थापना आणि त्याचा विश्वव्यापी झालेला भरीव प्रचार प्रसार.
श्रील प्रभुपाद यांचा जन्म १८९६ मध्ये श्रीकृष्ण अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव सोहळा साजरा केला जात होता त्या दिवशी झाला. हा योगायोगच. वैष्णव कुटुंबातील श्रील प्रभुपाद यांनी प्रथम झाशी मधून भागवताचा प्रसार सुरू केला. असं व्रज माधव दास प्रभुजींनी माहिती देताना सांगितले.
असं म्हटलं जातं की, सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार. कलकत्त्यामधील धार्मिक स्थळांची दर्शन घेऊन आम्ही गंगासागरकडे कुच झालो. येथे झालेला गंगा आणि सागर यांचा संगम हिंदूंसाठी परमपवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. तीन तासांचा बस प्रवास आणि एक तास बोटीतून प्रवास करून आम्ही गंगासागर येथे इस्कॉनच्या सुसज्ज गेस्ट हाऊस मध्ये दाखल झालो. दुपारी थोडी विश्रांती घेऊन नंतर गंगा जिथे सागराला मिळते त्या तीर्थस्थानावर गेलो. गंगा भारत देशाची चेतना, दर्शन आणि संस्कृती यांचे प्रतिनिधित्व करते असं ऐकलं होतं. तेथील नैसर्गिक सौंदर्य आणि वातावरणातील सकारात्मकता पाहून व अनुभवून गंगेची महत्ता लक्षात आली. येथेच महामुनी कपिल मुनींचे मंदिरही आहे. त्यांची महती रात्री कुमार गौरांग प्रभुजींच्या प्रवचनातून ऐकून दुसऱ्या दिवशी पहाटेच कलकत्ता मार्गे मायापुर या तीर्थक्षेत्राकडे आम्ही प्रयाण केले.
नवव्दीप म्हणजे गंगेमधील नवद्वीप. प्रत्येकाची वेगवेगळी नावे आहेत. हे एका कमळासारखे आहे. यातील जे मुख्य द्वीप आहे ते आहे अंतरव्दीप यालाच मायापुर पण म्हणतात. मायापूर येथे चंद्रोदय दर्शन व प्रार्थना झाली. त्यानंतर सीमंत द्वीप येथील राजापूर जगन्नाथ तीर्थस्थानाचे दर्शन तसेच सीमंतीनी देवीचे दर्शन घेतले. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी संपूर्ण भारतभर ६४ गौडीया मठांची स्थापना केली. सर्व गौडीयांचे प्रमुख केंद्र असलेल्या चैतन्य गौडीया मठ येथे दर्शन घेतले. येथे श्रील भक्ती सिद्धांत ठाकूर यांची समाधीही आहे. खरे तर वृंदावन मध्ये जी जी तीर्थस्थाने आहेत ती सर्व मायापूर मध्ये आहेत. वृंदावन मध्ये फक्त गोपींना तेथे प्रवेश होता. येथे मात्र सर्वांना प्रवेश होता. हे या स्थानाचे वैशिष्ट्य. राधा कुंड, श्याम कुंड, गोवर्धन दर्शन, गुरु गौरांग गंधर्विका, गिरिधारी यांचे दर्शन घेतल्यानंतर श्रीनिवास आंगण येथे गेलो. तेथे चैतन्य महाप्रभू आपल्या भक्तांसोबत कीर्तन करायचे. बाजूलाच अद्वेत भवन आणि गदाधर भवन आहे यांचे दर्शन घेऊन नंतर योगपीठला आलो. हे चैतन्य महाप्रभू यांचे जन्मस्थान. दर्शन घेतले आणि सायंकाळी तीन ते चार वाजता माॅं गंगा सफर झाली. बोटी मधून गंगामातेचे दर्शन करावयास गेलो होतो. बोटीतूनच गंगामातेची पूजा, प्रार्थना आणि कुमार गौरांग प्रभूजी यांचे भक्तीभावपूर्ण प्रवचनही झाले. तेथे गंगा माता आणि जालंगी नदीचा संगम पाहिला. चैतन्य महाप्रभू व श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्या लीला स्थळांवरही जाण्याचे भाग्य लाभले. मुख्य रुपात धाम दर्शन घेऊन समाधानाने पुढे निघालो.
टेम्पल ऑफ प्लॅनोटेरियम ला ही भेट देण्याचा सुवर्णयोग जुळून आला. हे एक अद्भुत मंदिर उभे राहत आहे. शील प्रभुपात यांची इच्छा होती की सगळं विश्व मायापुर या तीर्थस्थानाकडे आकर्षित व्हायला हवं. संपूर्ण जगातील इस्कॉनचे हे मुख्य तीर्थक्षेत्र असावे. त्या दृष्टीने मोठ्या भक्तीने, श्रद्धेने या देवस्थानाची उभारणी होते आहे. अडीच एकर भू क्षेत्रावर उभ्या रहात असलेल्या या तीर्थक्षेत्रात श्रीमत भागवत च्या पहिल्या स्कंदाचे संपूर्ण वर्णन असणार आहे. जसं की, ग्रहांची स्थिती कुठे आहे. वैकुंठ कुठे आहे. शिवजीच लोक कुठे आहे. देवीधाम कुठे आहे. हे सर्व वेगवेगळ्या मजल्यावर आम जनता पाहू शकणार आहे. जवळच असलेल्या श्रील प्रभुपाद यांच्या पुष्प समाधीचे दर्शन घेतलं. त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आलेख स्पष्ट करणारे प्रदर्शनही पाहण्याचा योग आला.
जगन्नाथ पुरी येथे आल्यावरही अनेक तीर्थस्थानांचे दर्शन झाले. नील माधव दर्शन, सात पाडा येथील चिलका लेक, चतुर्भुज विष्णू रूप असलेले शीला अलारनाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर आणि नंतर बाबा लिंगराज देवस्थानाचे दर्शन घेऊन ही धार्मिक यात्रा सुफल संपन्न झाली.
खरे तर! व्यवसायिकपणा बाजूला ठेवून या धार्मिक यात्रेचे आयोजन झाले. उत्कृष्ट व्यवस्थापन. दररोजचा आखीव रेखीव कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रत्येकाची जाणीवपूर्वक वैयक्तिक घेण्यात येत असलेली काळजी, यामुळे सहभागी जेष्ठांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. म्हणूनच गौरांग प्रभु जी आणि व्रज माधव दास प्रभू जी यांचे कौतुकाबरोबरच आभार मानावे तेवढे थोडेच. सहभागी ज्येष्ठ सौ. सुनंदा पायगुडे- लाड, सौ. कमल बाविस्कर, सौ. प्राची दिवाण, सौ. सोनाली प्रभू, सौ अलका भुजबळ, सौ नंदिनी पाटील, सौ उर्मिला पाटील, श्रीमती प्रमिला भोसले, श्रीमती सीमा जोशी, श्रीमती सौदामिनी जोशी, श्रीमती स्नेहल प्रभुनी, श्रीमती रत्ना स्वाली, सर्वस्वी महेश पायगुडे - लाड, महेश पायगुडे, साहेबराव बाविस्कर, सुभाष हांडे देशमुख, सुखदेव भुजबळ, सुरेंद्र पाटील आदींनी उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडला.