मायणी प्रतिनिधी
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जलनीती ही आजही भारतीय कृषीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांनी अर्थशास्त्रात दिलेल्या अभूतपूर्व योगदानामुळे त्यांना अनंत पैलूंचा अर्थशास्त्री म्हटले जाते," असे प्रतिपादन प्रा. डॉ. विलास बोदगिरे यांनी केले. ते येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील स्थायी विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी होते.
प्रारंभी भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. विकास कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ सयाजीराजे मोकाशी म्हणाले, "डॉ. आंबेडकरांचा संघर्ष हा मानवमुक्तीचा संघर्ष होता. महाडचा चवदार तळे संघर्ष व नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह ही याची उदाहरणे आहेत. म्हणूनच सामाजिक समता व न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी आंबेडकरी चळवळ वाढली पाहिजे."
आभार प्रदर्शन प्रा. श्रीकांत कांबळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. शौकतअली सय्यद, प्रा. स्वाती माळी, प्रा. डॉ.विजया कदम, प्रा. डॉ. अक्रम मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.