पंढरपूर प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, मिलिंद पाटील, धनंजय जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश तारु, पोलीस उपनिरिक्षक प्रशांत भागवत तसेच सर्व समाजातील विविध नागरिक, पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सरदेशपांडे म्हणाले, जातीय व धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रत्येक धर्माचा आदर राखणे आवश्यक असून त्यातूनच समाजातील शांतते बरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे शक्य होईल. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसून समाजात अशांतता पसरवण्याबरोबरच तेढ निर्माण करणाऱ्यावर कारवाईसाठी पोलीस प्रशासन तत्पर आहे. सार्वजनिकरित्या सण उत्सव साजरे करताना वर्गणी जमा करण्यात येते वर्गणी जमा करण्यावरून अनेक वेळा वाद निर्माण होऊन समाजामध्ये अशांतता निर्माण होण्याचे प्रसंग उद्भवतात त्यामुळे वर्गणी करताना संबंधितांनी कोणावरही जबरदस्ती करू नये अशा सूचनाही जिल्हा पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी यावेळी दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव कालावधीत वीज पुरवठा सुरक्षित राहील याची दक्षता महावितरण विभागाने घ्यावी. तसेच मिरवणुकीच्या दरम्यान विद्युत वाहिनीच्या तारांचा अडथळा होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. मंडळांनी उत्सव साजरा करताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणुकीच्या कालावधीत पोलीस प्रशासनात मार्फत कडेकोट सुरक्षा व्यवस्था राहणार असून, संपूर्ण मिरवणूक सीसीटीव्ही निगराणीच्या कक्षेत राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या निमित्ताने शिस्तप्रिय मिरवणूक, रचनात्मक व सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कालावधीत वाहतूक नियमन, पोलीस बंदोबस्त , मिरवणूक कालावधीत सुसज्ज रुग्णवाहिकेची उपलब्धता, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सूचना यावेळी बैठकीत पदाधिकारी व नागरिकांनी केल्या.