पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या यमाई तलावावर पंढरी नगरीतील काही स्वयंघोषित प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक यांनी रंगपंचमीचा आनंदोत्सव साजरा करताना परिसर अत्यंत अस्वच्छ करून पर्यावरणाची होळी केली त्यामुळे उपस्थित अधिकारी व आयोजक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अ. भा. ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याची माहिती तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये यांनी दिली.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून भाविकांसाठी, शहरातील जेष्ठ नागरिकासाठी तुळसी वृंदावन विकसित केले आहे. त्याठिकाणी अनेक संतांच्या मुर्ती, श्री विठ्ठलास आवडणाऱ्या विविध प्रकारच्या तुळशींची, तसेच इतर फुलझाडांची लागवड केली आहे. हे पाहण्यासाठी पंढरीत आलेले भाविक,तसेच पर्यटक याठिकाणी आवर्जून भेट देतात. जोडून सुट्टी आल्याने आजही याठिकाणी पर्यटक भाविक यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र त्यापरिसरात सकाळी साजरी केलेल्या रंगपंचमीनंतर राहिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, शिल्लक खाद्यपदार्थाच्या डिश, ग्लास,त्यावर ताव मारणारी डुकरे इ. पाहून त्यांच्या आनंदावर विरजण पडले, रंगाचा बेरंग झाला.अनेकांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रंगपंचमी साजरी करताना नगरपालिका,पोलीस,महसूल ग्रामविकास इ. खात्याचे उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. आनंदोत्सव साजरा करताना काही गोष्टींचे विस्मरण होते हे लक्षात घेऊन रंगपंचमीच्या अगोदर अ. भा ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये,तालुका संघटक महेश भोसले,उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, कार्य. सदस्य संजय खंडेलवाल यांना लेखी निवेदन देऊन मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन रंगपंचमी साजरी होताच तेथील यमाई तलाव परिसराची स्वच्छता करण्यात यावी अशा सामन्य मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले होते.
वास्तविक प्रवेश शुल्कासह या रंगोत्सवाचे आयोजन केलेले होते. तसेच स्वच्छता विभागाशी संबंधित अधिकारी (मुख्याधिकारी, पोलीस महसूल इ.) उपस्थित होते असे असतानाही याकडे दुर्लक्ष केले गेले ही अतिशय खेदाची बाब आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायत करीत आहे.
.